मुंबई, 16 ऑगस्ट: केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Latest News) लाभार्थ्यांना मोठी बातमी दिली आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सरकारनं ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै पासून 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ जे शेतकरी आतापर्यंत त्यांचे ई-केवायसी करू शकले नाहीत, ते आता 31 ऑगस्टपर्यंत करू शकतात. 12 वा हप्ता ई-केवायसी नंतरच मिळेल- या योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमची ई-केवायसी झाली नसेल, तर आगामी 12 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. पीएम किसानच्या ऑनलाइन पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. तुम्ही PM किसानच्या ऑनलाइन पोर्टलवर मोबाइल OTP द्वारे हे करू शकता. तुम्ही बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्राला भेट द्यावी लागेल. घरबसल्या मोबाईलद्वारे करा ई-केवायसी-
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावं लागेल.
- यानंतर, फार्मर कॉर्नरमध्ये (Farmer Croner) ई-केवायसी वर जा.
- ई-केवायसी वर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
हेही वाचा- Mutual Fundsमध्ये गुंतवणुकीसाठीची रक्कम कशी ठरवायची? तज्ज्ञांचा सल्ला समजून घ्या
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.
12 वा हप्ता लवकरच होईल जमा- मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरमध्ये जारी करू शकते. याबाबत सरकारकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 31 मे 2022 रोजी सरकारने 10 कोटी शेतकर्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले होते. पीएम किसान योजनेंतर्गत, सरकार पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये हस्तांतरित करते. दर चार महिन्यांच्या अंतराने एक हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो.