किरण मोहिते, सातारा, 31 ऑगस्ट : सातारा जिल्ह्यामध्ये सिरीयल किलर संतोष पोळ हत्याकांडाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून केला असल्याची घटना उघड झाली आहे. खून झालेले सर्व सांगली जिल्ह्यातील बांमनोली गावातील आहेत.
दोन मुलांसह आई वडीलांना घाटातील जंगलात मारून फेकून दिले आहे. या प्रकरणात जावली तालुक्यातील सोमर्डि गावातील आरोपी योगेश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुलांना आर्मीमध्ये भरती करतो असे म्हणून आरोपीने आर्थिक व्यवहार केले आणि हे हत्याकांड केल्याचे समजते आहे. आरोपीने आधी दोन्ही सख्या भावांचा खात्मा केला. त्यानंतर युवकांच्या आई-वडिलांना देखील तशाच पद्धतीने अज्ञात ठिकाणी नेवून गुंगीचे औषध देऊन त्यांचा खून केला आणि मारली घाटामध्ये मृतदेह फेकून दिले होते.
हे सर्व करण्यासाठी मागे आरोपीचा एकच उद्देश होता, तो म्हणजे नोकरीला लावतो म्हणून घेतलेले पैसे आरोपीला लाटायचे होते. ते पुन्हा आपल्या पाठीमागे तगादा लावतील, म्हणून एकाच कुटुंबातल्या चौघा जणांचा असा निर्घृण खून त्याने केला. या घटनेने सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्हा हादरला आहे.
मयत व्यक्तींची नावे
वडील - तानाजी जाधव- वय 55.
आई - मंदाकिनी जाधव वय 50
मुलगा - तुषार जाधव, वय 26 आणि विशाल जाधव, वय 20