भाग्यश्री प्रधान - आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 30 मे : हिमालय पर्वतावरील दुर्गम शिखरांपैकी एक असलेले कांचनजंगाचं शिखर सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण, ऑक्सीजनची कमतरता , अतिशय कमी तापमान , कधीही होणारी हिमवृष्टी यासारख्या नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत हे शिखर सर करणे कमी जणांना जमते. डोंबिवलीकर गिर्यारोहक ओमकार जोशीनं हे शिखर सर केलंय. या प्रकारची कामगिरी करणारा तो ठाणे जिल्ह्यातला पहिला गिर्यारोहक ठरलाय. सर्वात कठीण शिखर कांचनजंगा या शिखराची उंची 8 हजार 586 मीटर इतकी आहे. हे भारतामधील पहिलं आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या उंचीचं शिखर आहे. या शिखराची चढाई करणे हे कठीण असल्याचं गिर्यारोहक सांगतात. ओमकारच्या या मिशनमध्येही अनेक अडचणी आल्या. पण, त्यानं निर्धारानं ही चढाई पूर्ण केलीय.
‘माझ्या टीममध्ये जगभरातील 35 जण होते. त्यामध्ये मी एकमेव महाराष्ट्राीयन होतो. आम्ही 8,300 मीटरपर्यंत गेल्यानंतर आमचा मार्ग चुकला. त्यामुळे आम्हाला परत माघारी परतावं लागलं. पण, त्यानंतरही आम्ही हे शिखर सर केलं,’ असं ओमकारनं सांगितलं. 8300 मीटरची चढाई ही केवळ एका ऑक्सिजनच्या बाटलीच्या मदतीनं पूर्ण केली, असंही ओमकारनं यावेळी सांगितलं. हाडं गोठवणारी थंडी, श्वास घ्यायलाही अडचण, पण 6 वर्षांची आरिष्का 130 किमी चालली, VIDEO ओमकारनं त्याच्या टीमच्या मदतीनं यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिमाचल आणि लडाखच्या सिमेवरील 6,105 मीटर उंचीचं शिखर सर केलंय. या शिखराला त्यांनी त्याचे या क्षेत्रातले गुरू हरनाम सिंग टिंबा यांचं नाव दिलं. दहाव्या वर्षापासून गिर्यारोहणाची आवड ओमकारनं जोपासली आहे. प्रत्येक गिर्यारोकाप्रमाणं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं माझं स्वप्न आहे, असं ओमकारनं यावेळी सांगितलं.