अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 16 जून : सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरत असणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली आहे. पाडण्यात आलेली चिमणी बेकायदेशीर आणि अनधिकृत असल्याचा ठपका डीजीसीए सोलापूर महापालिका आणि हरित लवादानं ठेवला होता. आता ही चिमणी पडल्यानंतर विमानसेवा कधी सुरु होणार हा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे. सिद्धेश्वर सहकारी कारखान्याने वेळोवेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजू लावून धरली आहे. आम्हाला महापालिकेकडून परवानगी मिळेल अशी आशा होती, त्यामुळे चिमणीची उंची वाढवण्यात आली होती. पण, अनेक राजकीय हस्तक्षेपामुळे ही चिमणी पाडण्यात आलीय. सोलापूरच्या विकासातील हा काळा दिवस आहे, असं मत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे सदस्य दत्ता थोरे यांनी व्यक्त केलंय.
सोलापूर विकास मंचच्या केतन शहा यांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे. ‘डीजीसीएनं सोलापूरच्या होडगी विमानसेवेला परवानगी दिलेली नाही. या भागात अनेक अडथळे असल्यानं इथून विमान उडू शकत नाही, असा स्पष्ट आदेश डिजीसीएनं काढला होता,’ असं शहा यांनी सांगितलं. ‘सिद्धेश्वर’ची चिमणी का पाडली? 7 वर्षांचा आहे राजकीय इतिहास; पाहा PHOTO सोलापूरमध्ये डीजीसीएनं केलेल्या पाहणीत 106 पेक्षा जास्त अडथळे सांगण्यात आले होते. त्यापैकी चिमणी हा महत्त्वाचा अडथळा होता. हा अडथळा आता दूर झालाय.त्यामुळे लवकरच विमानसेवा सुरू होईल, अशी आशा सोलापूरकर व्यक्त करतायत. त्याचबरोबर पाच महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा विमानसेवेमुळे विकास होईल, शहरातील टेक्स्टाईल उद्योगालाही याचा फायदा होईल, असं मत सोलापूरकरांनी व्यक्त केलं आहे.