शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी, 10 जुलै : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) पंदेरी धरणाला (Panderi Dam) काही दिवसांपूर्वी गळती लागल्याचे समोर आले होते. ही गळती हळूहळू वाढल्याने एकच खळबळ उडाली होती. धरणाला लागलेली गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली. त्यानंतर आता आज गळती रोखण्याचे काम पूर्ण (Panderi Dam leakage stopped) करण्यात आले आहे. लघु पाट बंधारे विभागाचे कोकण विभागीय मुख्य इंजिनीयर संतोष तीरमवार यांनी धरणाची पाहणी करून धरण फुटीचा धोका टळला असल्याचे सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती लागल्याने पंदेरी, बहिरवली, कोडगाव या तीन गावांना धोका निर्माण झाला होता. तीन गावातील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, आता धरणाची गळती रोखण्यात यश आले आहे. धरण फुटीचा धोका टळल्याने स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. स्थलांतरित नागरिकांना पाच दिवसांनी पुन्हा आपल्या घरी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंदेरी, बहिरवली, कोडगाव या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
धक्कादायक! आगामी निवडणुकीत आव्हान नको म्हणून हत्या; नगरपरिषदेच्या सभापतीसह पाच जणांना अटक
धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश आल्याने आता धरणाचा धोका टळला असल्याचे बोलले जात आहे. गेले काही दिवस धरण फुटणार या भीतीने रात्र जागून काढणाऱ्या लोकांना धरणाचा धोका टळला असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी पुन्हा आपल्या घरी परतावे असे सांगण्यात आले आहे.
पंदेरी धरणाची गळती थांबली असली तरी धरण फुटीची भीती लोकांच्या मनात कायम आहे. धरण फुटीचा धोका टळला आहे परंतु खबरदारीचा उपयाय म्हणून घटनास्थळी एनडीआरएफची तुकडी तैनात आहे. सुमारे 100 पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. मात्र, आता हा पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri