सोलापूर, 19 जुलै : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत सुमारे १२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालकांसह सुमारे चारशे जणांना कारखान्याने नुकत्याच नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Pandharpur)
थकबाकी वसुलीचा एक भाग म्हणून कारखान्याने थकबाकी वसूलीची मोहिम हाती घेतली आहे. मागील अनेक वर्षांपासून थकबाकीदार असलेल्या माजी अध्यक्षांसह संचालकांना थकबाकी भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. थकबाकी न भरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ही कारखान्याने सुरू केल्याची माहिती नूतन संचालक अभिजीत पाटील यांनी दिली.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतंय, कदमांनी मंत्रालयातील गोष्टी केल्या उघड!
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये सत्ताधारी भगीरथ भालके - कल्याणराव काळे गटाचा पराभव झाला. डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल विजयी झाले आहे. येत्या २१ जुलै रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यापूर्वीच अभिजीत पाटील यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे.
पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना नवख्या अभिजित पाटील यांनी सत्ताधारी भगिरथ भालके यांचा पराभव करीत 18 वर्षानंतर सत्तांतर घडवले. अभिजित पाटील यांनी या विजयासह पाचवा कारखाना घेतला आहे. या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा हादरा मानला जात आहे. राष्ट्रवादीचे भगिरथ भालके, कल्याण काळे आणि भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्या सारख्या दिग्गजांच्या पॅनल पराभूत करीत अभिजित पाटील पुढे आले आहेत. विशेष म्हणजे सर्व नवख्या उमेदवारांना घेऊन पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती.
हे ही वाचा : शरद पवार आणि अजितदादांनी शिवसेना फोडली, रामदास कदमांचा थेट आरोप
पंढरपूरचे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून या कारखान्याच्या सत्तेकडे पहिले जाते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या मतदानाचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचे चित्र असून विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या नंबरवर फेकले गेल्याने भालके यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.