पुणे, 27 फेब्रुवारी : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याच्या (CAA) मुद्द्यावर देशभरात गदारोळ उडाला आहे. याच मुद्द्यावरून दिल्लीत हिंसाचार उसळला असून यामध्ये अनेक निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली आहे. आता दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी दिल्लीतील तणावाचा परिस्थितीला गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनामाच्या मागणी केली आहे. 'दिल्लीतील दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे. आपल्या धोरणास विरोध होत असेल तर तो प्रश्न सोडवण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
अमोल कोल्हे यांनी आज पुणे मनपात आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विकास प्रकल्प आणि विविध प्रश्नासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्याला मनपा आयुक्त, नगरसेवक तसंच संबंधीत प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
मृतांचा आकडा 48 वर पोहोचला
दिल्ली हिंसाचार प्रकरणातील मृतांचा आकडा आता 48 वर पोहोचला आहे. हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून आतापर्यंत 106 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. दिल्लीत दंगल भडकवल्याप्रकरणी 48 FIR दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah