नागपूर, 14 जुलै : अनेकदा भटकंती किंवा पर्यटनासाठी गेलेल्या व्यक्तींवर मधमाश्यांचा हल्ला झाल्याची बातमी आपण ऐकतो. हा हल्ला तीव्र असेल तर यामध्ये काही जणांचा जीव देखील गेला आहे. या प्रकारच्या घटना घडू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? त्याचबरोबर अनावधानानं हा प्रकार घडल्यास काय उपाययोजना करावी? या विषयीची अधिक माहिती आपण पाहूया निसर्गातील प्रत्येक प्राणी आत्मरक्षणााठी हल्ला करतो. अनेकदा मधमाश्या त्यांना त्रास दिल्यानं आत्मसंरक्षणासाठी हल्ला करतात, असा अनुभव आहे. आपल्या देशात मधमाश्यांच्या चार प्रमुख जाती आहेत. त्यापैकी आग्या मधमाशी ही सर्वात आक्रमक मधमाशी आहे. या मधमाश्यांना कुणी त्रास दिला, पोळ्याला दगड मारला तर त्या माश्या चिडतात. त्यानंतर मनुष्य किवा जनावरांवर हल्ला करतात, अशी माहिती नागपूरमधील मधमाशी अभ्यासक सुरेश गुडे यांनी दिलीय.
काय काळजी घ्याल? मधमाश्यांचं पोळं किंवा त्यांचा वावर ज्या ठिकाणी आहे त्यापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. या मधमाश्यांना इजा पोहचेल अशी कोणतीही कृती करू नये. मधमाश्यांच्या जवळ धूर करु नये किंवा कोणतीही वस्तू जाळू नये. या धुरात कार्बन डायऑक्साईन असल्यानं माशा चिडतात आणि हल्ला चढवतात. गडद प्रकारचे कपडे घातलेल्या व्यक्तीवर मधमाश्या हल्ला करतात, असे आजवर आढळलंय. त्यामुळे जंगल किंवा निर्मनुष्य ठिकाणी जाताना गडद कपडे घालणे टाळावं. परफ्युम किंवा सुंगधित द्रव्य मधमाशांना धोकादायक वाटतात. त्यामुळे त्याचा वापर टाळावा. या प्रकारच्या लहान मुद्यांचा विचार केला तर संभाव्य धोका टाळता येईल, असी माहिती प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आशिष झा यांनी दिली. राज्याच्या राजधानीत कोणत्या सापांचा आहे वावर? पावसाळ्यात अशा जागी बसतात लपून! मधमाशांनी हल्ला केल्यास ज्या ठिकाणी मधमाशी चावली असेल त्या जागी ती डंख सोडत असते. हा डंख तातडीनं काढावा. त्या जागेवर एखाद्या झाडाचे पान चोळावे. एका जागी डंख मारल्यास त्याचा गंध इतर मधमाश्यांना आकर्षित करतो, त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा एकदा टार्गेट होण्याची शक्यता असते, असे झा यांनी स्पष्ट केले.