नागपूर, 13 मार्च : मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भात 15 मार्च ते 18 मार्च या काळात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.
शेतकऱ्यांनी शेतीची कामं लवकर आटोपती घेत पिकांची काळजी घेण्याचं आवाहन नागपूर वेधशाळेने केलं आहे. तसंच 17 मार्चनंतरदेखील गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
होळीच्या तोंडावरच राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झालं. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागच्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अजूनही अधिकारी बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण करू नका, फडणवीसांनी सुनावलं
मागच्या काळात चक्रीवादळ आले होते, त्यावेळी पैसे दिले नव्हते, त्यामुळे राजकीय बोलू देऊ नका. यावर कोणतेही राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली सगळी माहिती दिली आहे. या नुकसानीबद्दल तत्काळ मदत दिली जातील. एक गोष्ट मदत आहे, विरोधी पक्षांना फक्त शेतकऱ्यांच्या मुद्यावर राजकारण करायचे आहे. हे मगरीचे अश्रू आहे. कोकणावर संकट आले तेव्हा आम्ही मदत केली होती. कांदा उत्पादकांना मदत दिली जाणार आहे. काल अवकाळी पाऊस आला, याचे तत्काळ पंचनामे करण्यात आले आहे. पंचनामे केल्याशिवाय मदत दिली जात नाही, हे विरोधकांना माहिती आहे. फक्त विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. कांदा उत्पादकांना सरकार मदत करेल. अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. विरोधकांनी सभात्याग केले आहे, ते केवळ राजकारण आहे, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.