नेहाल भूरे, प्रतिनिधी भंडारा, 11 एप्रिल : भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल 9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लागला आहे. या हत्याकांडाप्रकरणी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश अस्मार यांनी 7 आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर सोबतच 10 हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. तब्बल नऊ वर्षानंतर या सोनी हत्याकांडाचा निकाल लागला.
काय आहे प्रकरण - भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा ध्रुविल या तिघांचा 26 फेब्रुवारी 2014 च्या मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख, असे साडेतीन कोटींचा ऐवज पळविला होता. त्यानंतर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली होती.
यातील चार आरोपींना तुमसरातून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती. हत्याकांडात बचावलेली संजय सोनी यांची मुलगी हीरल ही न्यायालयात अॅड.निकम यांची भेट घेऊन आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तुमसर पोलिसांनी या प्रकरणात 800 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
तसेच पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर केले होते. विशेष म्हणजे आज मृतक ध्रुविल याचा वाढदिवस असून आज याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या आत्म्याला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. तर मन सुन्न करणाऱ्या या हत्याकांडाचा आज आरोपींना शिक्षा झाल्याने सर्वत्र या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांडाप्रकरणी सात आरोपींवर काल आरोप सिद्ध झाल्यानंतर सातही आरोपींना आज आजीवन कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले रा. तुमसर, सोहेल शेख , रफीक शेख रा.नागपूर यांचा समावेश आहे. आरोपीच्या वतीने अॅड. धनंजय बोरकर यांनी बाजू मांडली.