इंदापूर, 6 फेब्रुवारी : इंदापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत बघायला मिळाले. सभेमध्ये कार्यकर्त्यांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देताना अजित पवारांनी जोरदार बॅटिंग केली. एक बाटली तोंडाला लावली की आपण खलासच करतो, फक्त पाण्याची, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना निर्व्यसनी राहण्याचा संस्काराचा कानमंत्र दिला.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून (Farmers Protest) अजित पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली. चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या, पण काहीच नाही. खिळे मारत आहेत, काही जनाची नाही, मनाची आहे का नाही? लोकशाहीमध्ये ठोकशाही करत आहेत. माध्यमांनी उचलून धरल्यावर खिळे काढायला लागले. भाजपचा एकही नेता शेतकऱ्याच्या बाजूने बोलत नाही, असं अजित पवार म्हणाले. इंदापूरच्या या कार्यक्रमात अजान सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी आपलं भाषण थांबवलं. इंदापूरमधल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. इंदापूरकरांनी आमच्या हातात सत्ता द्या, त्यांच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवतो. नाही दाखवलं तर अजित पवार नाव सांगणार नाही, असं आवाहन अजित पवारांनी केलं.