अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे : मुंबई, ठाण्यासोबत उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. मुंबई-ठाण्यासह उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. चार तास झालेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली तर अनेक ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली होती. याचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. आई-वडिलांनाही मुलं घरी कशी परतणार याची चिंता होती. मुसळधार पावसाने रफीका हायस्कूलमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच अडकले. घरी कसं जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. संध्याकाळी 6च्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापाचे अधिकारी तातडीने तिथे पोहोचले. म्हापे रोड, शिळफाटा, दिवा येथे फाउंटन हॉटेल जवळ मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे रफीका हायस्कूल या शाळेमध्ये पाणी शिरलं होतं.
त्यामुळे शाळेतील विद्यार्थी अडकले होते. अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहनासह विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यासाठी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू केलं. शाळेमध्ये अडकलेल्या १७० मुलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. मुंबई-ठाण्यासह गुरुवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास पावसाने जोर धरला होता. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी सजलं होतं. लोकल सेवाही विस्कळीत झाली होती. या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवली.