शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत थोरले चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेटली. निहार ठाकरे यांनी शिंदेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सख्खा पुतणा निहार ठाकरे शिंदेंना जावून मिळाला. त्यामुळे शिवसेना घरातूनच फुटली, अशा चर्चांना उधाण आलं. दरम्यान, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं कुटुंब किती मोठं आहे. अजून किती लोक या कुटुंबात आहे? हे अनेकांना माहिती नाही. या निमित्ताने त्यांचा फॅमिली ट्री जाणून घेऊ.
निहार यांनी शिंदेंच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण शिंदेंना का भेटलो? याबाबत माहिती दिली. निहार यांनी एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईत पूर्णपणे मदतीचं आश्वासन दिलं आहे. निहार हे पेशाने वकील आहेत. त्यांचं स्वत:चं लॉ फर्म आहे. त्यामुळे कोर्ट-कायदेशीर लढाईत शिंदेंना त्यांची खरंच मदत होवू शकते. निहार यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधातील गटाला पाठिंबा दिल्याने मुख्य शिवसेनेला मोठा झटका मानला जातोय.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुलं होती. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचं 20 एप्रिल 1996 रोजी लोणावळा इथे एका मोटार अपघातात निधन झालं होतं. बिंदूमाधव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे आणि नेहा अशी दोन मुलं आहेत. निहार खरंतर पेशाने वकील आणि व्यावसायिक आहेत. त्यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे.
बाळासाहेब यांचे दुसरे चिरंजीव जयदेव यांनी तीन लग्न केली. यातील पहिली पत्नी जयश्री कलेकर यांच्यापासून एक मुलगा आहे. जयदीप असं त्यांचं नाव आहे. दुसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून राहुल आणि ऐश्वर्य अशी दोन मुलं आहेत. तर तिसरी पत्नी अनुराधा यांच्यापासून जयदेव यांना माधुरी नावाची एक मुलगी आहे. जयदेव ठाकरे यांना तीन बायकांपासून एकूण चार मुलं आहेत.
यातील स्मिता ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळीही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पूर्वी स्मिता ठाकरे देखील राजकारणात सक्रीय होत्या. मात्र, उद्धव ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्या दूर गेल्या.
बाळासाहेबांचे सर्वात लहान चिरंजीव म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. बाळासाहेबांनी उद्धव यांना आपलं राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलं होतं. उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी ठाकरे यांच्याशी झाला आहे.
उद्धव यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा आदित्य ठाकरे आणि दुसरा तेजस ठाकरे. पैकी आदित्य राजकारणात सक्रीय असून मागच्या सरकारमध्ये मंत्री देखील होते. तर तेजस ठाकरे ह्यांना जीवशास्त्रात रस असून ते राजकारणात दिसत नाही.