रत्नागिरी, 7 जानेवारी : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज केला आहे. काल शुक्रवारी रात्री आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने आमदार योगेश कदम यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. मात्र, त्यांचा चालक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी आतपाताचा आरोप केला आहे.
पूर्वनियोजित कट असल्याचा संशय : रामदास कदम
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय रामदास कदम यांनी केला आहे. तसेच अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता. योगेश कदम यांच्या कारला झालेला अपघाता हा घातपत करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. या संधार्भात सखोल चौकशी होण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.
वाचा - 64 विद्यार्थ्यांच्या स्कूल बसचा ब्रेक फेल, दरीत कोसळताना थोडक्यात...; अंगाचा थरकाप उडवणारा Video
कसा झाला अपघात?
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे. यात आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच चालक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कशेडी घाट मृत्यूचा सापळा?
गेल्या 13 वर्षांपासून मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असल्याने हा रस्ता प्रवासी आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अपघातांमुळे या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर जानेवारी – नोव्हेंबर 2022 या कालावधीत झालेल्या 129 प्राणांतिक रस्ते अपघातात 150 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीतून उघडकीस आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ramdas kadam, Ratnagiri