मुंबई, 26 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेदेखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुपारी 3:30वाजता देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यातून ते महत्त्वाची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता फडणवीसांही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण अजिप पवार हे 54 आमदारांचा पाठिंबा भाजपला देणार होते. पण त्यांनीच राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप उडाला आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. अशातच अजित पवार यांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताचा 145 हा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. आमच्याकडे बहुमत नसल्याचा भाजपच्या बड्या नेत्याचा दावा भाजपला उद्या बहुमताचा आकडा सिद्ध करायचा असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो पण एनडीएकडे बहुमत नसल्याचा दावा रामदार आठवले यांनी केला आहे. पण अजित पवारांच्या मदतीने आणि त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याने आम्ही बहुमत सिद्ध करू असं रामदास आठवले म्हटले आहेत.
अजित पवार परतण्यासाठी राष्ट्रवादीने केली प्रयत्नांची पराकाष्ठा राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला मदत करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काल अजित पवार आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार होते. मात्र अजित पवार विधानभवनात पोहचले आणि पदभार न स्वीकारताच घरी परतले. अजित पवार काल विधानभवनात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही तिथे दाखल झाले. त्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांमध्ये तब्बल 4 तास बैठक चालली. ही बैठक संपताच अजित पवार यांनी पदभार न स्वीकारता घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा मार्ग खुला ठेवला आहे का, अशी चर्चा तेव्हाच सुरू झाली होती. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पक्षातील दिग्गज नेते त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत होते. या पार्श्वभूमीवरच विधानमंडळात अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या नेत्यांमध्ये काल मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीत दीड तास अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर सुनील तटकरे हे या बैठकीतून बाहेर पडले. मात्र उर्वरित नेत्यांमध्ये तब्बल 4 तास बैठक चालली.

)







