मुंबई, 15 जून : भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन तर झालं नाही हे तपासण्यासाठी देशभरात सिरो सर्व्हे केला जातो आहे. देशभरातील 83 जिल्ह्यांमध्ये हा सिरो सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सिरो सर्व्हेचा अहवाल सरकारने जारी केला आहे.
राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा या सिरो सर्व्हेत समावेश होता. त्यामध्ये एकूण 2385 नमुन्यांपैकी फक्त 27 नमुने पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली नाही, असं राज्य सरकारने सांगितलं. दरम्यान आयसीएमआरनेदेखील भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही, असं स्पष्ट केलं आहे.
काय आहे सिरो सर्व्हे?
एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झालेली असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडी़ज तपासण्यासाठी ब्लड सीरम टेस्ट केली जाते. सिरो सर्व्हे अंतर्गत हीच टेस्ट करण्यात आली. ज्यामुळे किती लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार झाल्यात आणि कोरोनाव्हायरसचं संक्रमण किती प्रमाणात झालं आहे, याची माहिती मिळण्यास मदत झाली.
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या
सिरो सर्व्हे रिपोर्टनुसार राज्यात अद्याप तरी कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचं दिसत नाही. मात्र राज्यातील रुग्णआंची आकडेवारी मात्र वाढते आहे. सोमवारी राज्यात दिवसभरात अडीच हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2786 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 110744 झाली आहे. गेले काही दिवस राज्यात सातत्याने अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. राज्यात आतापर्यंत 4128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिलासादायक म्हणजे राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा पहिल्यांदाच वाढली आहे. अनलॉक नंतर पहिल्यांदाच राज्यात एका दिवशी 5 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.