नवी दिल्ली 24 ऑगस्ट: काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. काँग्रेसचा अध्यक्ष बदला अशी मागणी काही नेत्यांकडून करण्यात आली होती. याचं एक पत्र सोनिया गांधी यांना देण्यात आलं होतं. यावरच महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये दोन गट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या एकूण 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहलं आणि अध्यक्ष बदलाची मागणी केली. त्यामुळे आता गांधी कुटुंबाला समर्थन देणारा आणि काँग्रेसच्या विकासाचा विचार करणारा असे दोन गट सध्या पडले आहेत. यावर सुनिल केदार यांनी टीका करत एक ट्वीट केलं आहे. संपूर्ण पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. अशात गांधी कुटुंबाच्या कामावर मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्न उपस्थित करणं ही लाजिरवाणी बाब आहे. या नेत्यांनी त्यांनी केलेल्या कृत्यावर तातडीने माफी मागावी. असं झालं नाही तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात कुठेही फिरकू देणार नाही असं सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.
I wholeheartedly support Hon. Sonia Gandhi ji as president. Its shameful on Mukul Wasnik, Prithviraj Chavhan and Milind Deora to raise questions on leadership of Gandhi family. These leaders must apologies for their act immediately. Otherwise Congress workers will see how they
— Sunil Kedar (@SunilKedar1111) August 23, 2020
इतकंच नाही तर ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेतृत्त्व गांधी घराण्याकडे असेल तरच भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यामागे ठामपणे उभं राहण्याची हीच खरी वेळ असल्याचं सनिल केदार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यसमितीची आज बैठक होणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा अध्यक्षपदाचा राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. सोनिया गांधी यांना आता जास्त काळ कार्यकारी अध्यक्षपदावर राहण्याची इच्छा नाही. मात्र पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांनीच कायम राहावं असं म्हटलं आहे. तर तरुण नेत्यांना राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर यावं असं वाटतं. त्यामुळे पक्षात ज्येष्ठ आणि तरुण असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.