जालना, 18 मार्च : होळीपासून सुरू झालेल्या अकाळी पावसाने अनेक जिल्ह्यात शेतमालाचे अतोनात नुकसान केले आहे. गेल्या दोनतीन दिवसात गारपीटीसह पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. अशात कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार म्हटल्यावर शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाच मिनिटांत पाहणी केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे बीडहून भोकरदनकडे जात होते. त्यावेळी त्यांनी वडिगोद्री येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात गव्हाच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळं काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मदतीची मागणी करतोय. मात्र, कृषी मंत्री अब्दुल सत्तार आले आणि अवघ्या पाच मिमिटांत पाहणी करून गेले. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
वाचा - 'फक्त 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख..' बावनकुळेंच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
काय म्हणाले कृषी मंत्री अब्दुल सत्तार?
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
यवतमाळ जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल पासून ढगाळ वातावरण आहे. आज 4 वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील पोफळी, उमरखेड, मुळावा, झाडगाव परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. जवळ पास वीस मीनीट गारांचा वर्षाव सुरू होता. त्यामुळे सरविकडे गारांचा खच दिसून येत आहे. या पावसाने राज्य महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. आज झालेल्या धुवाधार पावसाने गहू, चना, ज्वारी या पिकांचं मोठ नुकसान झालं. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी गव्हाच्या गंजी लाऊन ठेवल्या होत्या. त्या पावसाने पूर्णपणे ओल्या झाल्या. त्यामुळे शेतकरी आता हैराण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.