नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 20 फेब्रुवारी : सततचा दुष्काळ आणि अवकाळी अतिवृष्टी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. यामुळे इथला शेतकरी नेहमी अस्मानी संकटात पिचला जात आहे. मात्र, या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने कायमस्वरूपी तोडगा काढलाय. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील शेतकऱ्याने तब्बल 2 एकरात विहिरीप्रमाने गोल शेततळे तयार केले असून याची खोली तब्बल 55 फूट इतकी आहे. किती आला खर्च? शेतकरी सखाराम सुरडकर यांनी या शेततळ्याची उभारणी केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी 55 फूट खोल आणि 2 एकर क्षेत्रात अवाढव्य शेततळ्याची कल्पना साकार करून दाखवली आहे. तलावाचे खोदकाम करण्यासाठी त्यांना तब्बल 39 लाखांचा खर्च आला. तर शेततळ्यामध्ये पन्नी टाकण्यासाठी 11 लाखांचा खर्च आला.
का केली निर्मिती? सखाराम सुरडकर यांच्याकडे एकूण 21 एकर शेती आहे. सतत पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्यांना इच्छा असूनदेखील हवे ते पीक घेता येत नव्हते. यावर कायमवरूपी तोडगा काढण्यासाठी आपण हे भव्य शेततळे तयार केल्याचे सखाराम सुरडकर यांनी सांगितले. या शेततळ्याच्या पाण्याचा उपयोग करून त्यांना हवे ते पीक आता घेता येणार आहे. त्याशिवाय परिसरातील कमी पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पाणी पुरविता येणार आहे. सध्या त्यांच्या शेतात ज्वारी, बाजरी अशी कोरडवाहू पिके आहेत. मात्र, भविष्यात ड्रॅगन फ्रूट, मोसंबी अशी बागायती पिके ते घेणार आहेत. शेतकरी शेतावर भेटी देतात 2 एकरात असणाऱ्या या विस्तीर्ण शेततळ्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी परिसातील शेतकरी त्यांच्या शेतावर भेटी देत आहेत. शेततळ्यामध्ये असणारे निळेशार पाणी प्रत्येकाला भूरळ घालते, असं सखाराम सुरडकर सांगतात.