जालना, 10 फेब्रुवारी : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम नुकतीच संपली. मात्र अजूनही काही ठिकाणी सरपंचपदाची निवडणूक बाकी आहे. अशातच ऐन सरपंचपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर चक्क एका ग्रामपंचायत सदस्याचं अपहरण झाल्याचा प्रकार जालना तालुक्यातील वखारी गावात घडला आहे. याप्रकरणी विरोधी गटातील 6 जणांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना तालुक्यातील वखारी ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली असून सरपंचपदाची निवडणूक अद्याप बाकी आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच गावातील एक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य बेपत्ता असल्याचं उघडकीस आलं. संदीप रामप्रसाद बोरुडे असं या बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे.
हेही वाचा - राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून फडणवीसांचा अजितदादांना सणसणीत टोला
दरम्यान, सरपंचपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी गटाकडून संदीप बोरुडे यांचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप बोरूडेंच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी तालुका जालना पोलिसांनी वखारी गावातील 6 जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कोकणातही घडली घटना
सरपंच निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचं अपहरण नाट्य घडलं आहे. कादवड ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचं अपहरण झाल्याची तक्रार चिपळूण पोलिसात देण्यात आली आहे. अपहरण झालेल्या सदस्यांना शोधण्यासाठी चिपळूण पोलिसांची धावाधाव सुरू आहे. सरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडत असताना झालेल्या अपहरण नाट्यामुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे.