मुंबई, 14 मार्च: सध्या राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गोवा, कोकण किनारपट्टी (Goa, Konkan coast) आणि उत्तर महाराष्ट्र तापमानाचा (temperature) पारा वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र 17 मार्चनंतरच उन्हाळ्याच्या झळा बसू लागतील, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईसह इतर उपनगरांतही तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान वाढल्यास मार्च महिन्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. मुंबईसह, पालघर (Palghar), रायगड (Raigad), ठाण्यातही तापमान 42 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुंबईत उष्णता वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मुंबई उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण: येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2022
-IMD
कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर व कमाल तापमान किमान 37°Cअसावे. pic.twitter.com/0u2vQ2ivLn
होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचं IMD नं सांगितलं आहे." पुढे ते म्हणाले की, “कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर आणि कमाल तापमान किमान 37°C असावं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, मराठवाडा-विदर्भातही उष्ण तापमान असेल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या तापमानामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी आणि काळजी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्यात.