रायगड, 19 जुलै: पावसाचं आगमन झालं असून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी धो धो पाऊस कोसळत असल्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्यात थैमान घातलं आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. अशातच रायगडमध्ये पूर स्थिती झाल्यामुळे तेथील लोकांनी चक्क पाण्यात गेलेल्या गणपतीची पूजा केली. खालापूर, पेण पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावालगत जाणाऱ्या पातळगंगा नदीला पूर आल्यानं संपूर्ण गाव पाण्यात गेलं आहे. आपटा गावातील गणपतीच मंदिर पावसाच्या पाण्यात अर्धवट बुडालं. अर्धवट बुडालेला गणपती मंदिरात ग्रामस्थानी छातीभर पाण्यात उभं राहुन गणपतीची आरती केली.
गणपतीची पूजा करताना व्हिडीओ सध्या समोर आला आहे. काही वेळातच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पहायला मिळतोय. गावावर आलेलं विघ्न दूर करण्याची विनवणी गावकऱ्यांनी या गणपतीकडे गेली आहे.
खालापूर, पेण पनवेल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आपटा गावालगत जाणाऱ्या पातळगंगा नदीला पूर आल्याने संपूर्ण गाव पाण्यामध्ये. पाण्यात अर्धवट बुडालेला गणपती मंदिरात ग्रामस्थांनी छातीभर पाण्यात उभे राहून गणपतीची आरती केली.#rain #MaharashtraRain #News18Lokmat pic.twitter.com/sqIs20pA4a
— News18Lokmat (@News18lokmat) July 19, 2023
दरम्यान, या पावसामुळे सावित्री आणि पाताळगंगा या दोन्हीही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय. ठिकठिकाणी पाणी शिरलं असल्याने दळणवळणही विस्कळीत झालं आहे. यासोबतच जोरदार पावसामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेकांच्या घरात मध्यरात्री पाणी शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली. जागोजागी पाणी साचलं असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांचे शेतंही पाण्याखाली गेले असल्याने शेतकरीराजा ही चिंतेत आहे.

)







