नागपूर, 07 जून : संघ हा फक्त हिंदूसाठी नाहीतर समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे असं सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचं काम पाहा मग बोला असा सल्ला दिलाय. तसंच सरकार खूप काही करू शकतं पण सरकार सगळं काही करू शकत नाही असंही भागवत यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी यांना बोलवण्यात आल्यामुळे झालेल्या वादाचा समाचार घेतला. दरवर्षी आम्ही दिग्गज व्यक्तीला आमंत्रित करत असतो. त्यावर वाद घालणे हे निरर्थक आहे. आज मुखर्जी आमच्या कार्यक्रमाला आले याचा अर्थ ते बदलणार असा नाही. ते जे आहे तेच राहणार आहे आणि संघ संघाच्या जागी कायम राहणार आहे असं भागवतांनी स्पष्ट केलं. संघ हा फक्त हिंदूसाठी नाहीतर समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. संघाच्या कामाला प्रत्यक्ष बघा, ते खरं आहे का नाही ते येऊन पहा…चांगलं वाटलं तर आपलं स्वागतच आहे. नाही पटलं तर जाण्याची सगळ्यांना मोकळीक आहे असंही भागवतांनी नमूद केलं. तसंच आम्ही जसे आहोत तसेच दिसतो आणि तसंच काम करतोय. शक्ती संघटनेत असते.सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्यात असते आणि शक्तीला जर शील जोडलं गेलं ( चारित्र्य ) तर त्याला अधिक शक्ती प्राप्त होते. समाजामध्ये संघाला संघटन करायचं नाहीये तर समाजाचं संघटन करायचं आहे असंही भागवत म्हणाले. तसंच डाॅ. हेडगेवार काँग्रेसच्या आंदोलनात दोन वेळा तुरुंगात गेले होते, समाजसुधारणेच्या कामातही त्यांचं योगदान अशी आठवणीही भागवतांनी काढली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.