नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 12 एप्रिल : राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक शहरात उष्णतेची लाट येणार, असा इशारा देण्यात आला आहे. अशातच जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. जळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा उन्हाचा फटका बसल्याने उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेतात काम करताना या शेतमजुराचा मृत्यू झाला.
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे काही ठिकाणी उकाडाही वाढला आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शेतमजुराचा शेतात काम करताना उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी आहे. पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर शेतात काम करत होता. उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो शेतात खाली कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. शेती कामासाठी गेला असता शेतात काम करताना चक्कर आली आणि शुद्ध हरपली. त्यास अत्यवस्थ अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तर नेमका त्या शेतकऱ्याचा मृत्यू कसा झाला, याची माहिती घेऊन आपणास पुढे कळवू अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकारांना दिली.