गणेश दुडम, प्रतिनिधी मावळ, 13 जून : पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर केमिकलचा टँकर जळून खाक झाला आहे. यात होरपळलेल्या चौघांचा मृत्यू तर दोघे जखमी झालेत, यामुळे दोन्ही कडची वाहतूक तब्बल साडे पाच तास ठप्प होती. मुंबईच्या दिशेने मिथेनॉल केमिकलची वाहतूक करणारा टँकर डिव्हाईडरला धडकला आणि टँकर पलटी झाला. त्यानंतर मिथेनॉल महामार्गावरील पुलावर पसरलं. तेच केमिकल खालून दुचाकीवरून निघालेल्या तिघांच्या अंगावर पडलं. मग काही कळायच्या आत केमिकलने पेट घेतला, यात टँकर मधील आणि खालच्या मार्गावरील असे सहा जण होरपळले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. सायंकाळचे पाच वाजले तरी परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अनेक प्रवासी अडकले. हजला जाणाऱ्यांची मुंबई विमान तळावर पोहचण्यासाठी धावपळ सुरू झाली. देशातील सर्वोत्तम महामार्गावरील यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. जवळपास साडे पाच तासानंतर टँकर बाजूला घेण्यात यश आलं. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. एक्सप्रेस वे च्या वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची स्थानिकांनी तहान-भूक भागवली. यानिमित्ताने माणुसकीचे दर्शन घडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.