डोंबिवली, 30 जानेवारी : राजकारणात कायम कोणीही कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, असं बोललं जातं. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींमुळे तर याची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांनाच आली. शिवसेनेनं भाजपपासून दूर होत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत ऐतिहासिक आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप आगामी निवडणुकांसाठी नव्या मित्राच्या शोधात असल्याचं बोललं जात असून भाजप-मनसे युतीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र ही चर्चा पुढे जाण्यााआधीच भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.
'अजून तरी भाजप-मनसे युतीची बातचीत झालेली नाही. आम्ही एकट्याच्या जीवावरच इतिहास घडवणार आहोत,' असं वक्तव्य भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलं. शेलार यांच्या या वक्तव्याचा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
'आम्ही कुठे त्यांना विचारायला गेलो आहे की आम्हाला युतीत घ्या? उगीचंच काहीतरी झगा मगा आणि माझ्याकडे बघा. आम्ही विचारायला आलो तर प्रतिक्रिया द्या ना,' असं म्हणत राजू पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा - Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बोलले
दरम्यान, राज्यातील राजकीय गणितं बदलण्याआधी म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकांआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वाढत असलेली जवळीक चर्चेचा विषय ठरली होती. निवडणुकांमध्ये मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाईल असं बोललं जात होतं. मात्र नंतरच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीनेच शिवसेनेला सोबत घेण्याचं पसंद केलं. त्यामुळे आता एकाकी पडलेले भाजप आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.