डोंबिवली, 1 फेब्रुवारी : मनसेचे (MNS) डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या मनसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राजेश कदम आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांनी पक्षाची फसवणूक करत पाठीत खंजीर खुपसल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी राजेश कदम यांच्या जाण्यामुळे चांगला कार्यकर्ता पक्ष सोडून गेल्याची खंत असल्याचं सांगितलं, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने कुणा एकासाठी पक्ष थांबत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच राजेश कदम यांना पक्षाने सर्वकाही दिलं, आमदारकीची उमेदवारीही दिली, मात्र ते का गेले? हे अनाकलनीय असल्याचं राजू पाटील म्हणाले. तसंच ही महापालिका निकडणुकीची तयारी नसून शिवसेना भाजपा युती तुटल्याने डळमळीत झालेली कल्याण लोकसभेची जागा मजबूत करण्यासाठी ही खेळी असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. ‘मला माफ करा…’, Whats app ग्रुपमधील शेवटचा मेसेज व्हायरल मनसेतून बाहेर पडलेले राजेश कदम हे पक्षाचे जुने नेते आहेत. त्यांनी विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे राजेश कदम यांच्यासारखा नेता पक्ष सोडून गेल्याने डोंबिवलीतील कार्यकर्तेही गोंधळात पडले. मात्र अशातच राजेश कदम यांच्या नावाने एका व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. ‘मनसे मध्यवर्ती, डोंबिवली’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सर्वांना मनापासून धन्यवाद…मला माफ करा…तुमच्यावर नेहमीच प्रेम असेल, आपला राजेश कदम,’ असा मेसेज राजेश कदम यांनी टाकल्याचं व्हायरल स्क्रीनशॉटमधून दिसत आहे.
दरम्यान, हा मेसेज नक्की राजेश कदम यांनीच पाठवला आहे की नाही, याबाबत त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.