सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
संभाजीनगर, 26 मे : बारावीच्या परीक्षांचा निकाल गुरूवारी जाहीर झाला, पण संभाजीनगर बारावी विज्ञान परिक्षेमध्ये कोड्यात टाकणारा गोंधळ निर्माण झाला होता. चक्क 392 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदलले होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका जमा केल्यानंतर त्यामध्ये नंतर काही उत्तरं लिहिली गेली. या प्रकरणात आता संशयित प्राध्यापक विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
संभाजीनगर दहावी बारावी बोर्डाच्या विभागीय कार्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला, कारण त्यांचा निकाल काल बोर्डाने जाहीर केला आहे. या 392 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदलले गेले होते. एकाच उत्तर पत्रिकेत दोघांचे हस्ताक्षर होते. उत्तर पत्रिका एकाने सोडवली की दोघांनी हा सवाल बोर्डासमोर उभा ठाकला होता, म्हणून या विद्यार्थ्यांना भीती होती आपला निकाल लागेल की नाही. ह्या प्रकरणात बोर्डाने संशयित प्राध्यापक विरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बारावी विज्ञान विषयाच्या भौतिशास्त्रातील उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदलाचा गोंधळ झाला. या गोंधळाला सोयगाव येथील दोन प्राध्यापक संशयाच्या भोवऱ्यात आहेत. कारण ज्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल झाला त्या सर्व उत्तर पत्रिका या दोन प्राध्यापकांनी तपासल्या आहेत. विद्यार्थ्यांपासून सर्वांच्या चौकशी करण्यात आल्या, यात कुणीही दोषी आढळले नाही. पण दोन प्राध्यापकांवर संशय घेण्यात येत आहे, कारण त्यांना काही प्रश्नाचे स्पष्टीकरण देता आले नाही.
बारावी बोर्ड प्रशासन गेल्या महिना भरापासून या प्रकरणाची चौकशी करीत आहे. निकाल लावण्याच्या एक दिवस आधी बोर्डाने दोन प्राध्यापकांवर संशय व्यक्त केला, कारण उत्तर पत्रिका तपासल्यानंतर या प्राध्यापकांनी एक महिना उत्तर पत्रिका बोर्डात जमा केल्या नाहीत. सर्व उत्तर पत्रिकांमध्ये बदललेलं हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे आहे, त्यामुळे पोलीस तपास कुठे जातो? हे पाहणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: HSC Result