छत्रपती संभाजीनगर, 18 जून : अर्धा जून महिना सरला तरी महाराष्ट्रात पावसाचा पत्ता दिसत नाही. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून पावसाला उशीर होण्याचा अंदाज आहे. लांबलेल्या पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या अद्याप झाल्या नाही. हे कमी होतं की काय म्हणून मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठाही खोलवर गेला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांकडून पेरणी व लागवड मराठवाड्याच्या 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 36.02 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या केवळ 13.2 मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. तर बियाण्यांची 9 ते 10 टक्के विक्री सिंचनाच्या सोयीचा अंदाज घेऊन झाली आहे. अत्यल्प प्रमाणात तूर, कपाशी, मिरचीसारख्या पिकाच्या लागवडीस शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत. मराठवाड्यातील ऐकून पाणी साठा 36.02 टक्के
- प्रकल्प नुसार पाणीसाठा टक्केवारीमध्ये
- जायकवाडी 30.14 टक्के
- निम्न दुधना 27.39 टक्के
- येलदरी 56.57 टक्के
- सिद्धेश्वर 00.00 टक्के
- माजलगाव 21.09 टक्के
- मांजरा 21.62 टक्के
- पैनगंगा 45.17 टक्के
- मानार 35.59 टक्के
- निम्न तेरणा 32.12 टक्के
- विष्णुपुरी 45.87 टक्के
- सिना कोळेगाव 02.03 टक्के
पाऊस लांबल्याने काळजी ढग बिपरजॉय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला थेट फटका बसल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. राज्यात नऊ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ 8.8 टक्के पाऊस पडला आहे. परिणामी खरिपाची पेरणी रखडली आहे. राज्यातील खरीप पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी अवघ्या एक टक्का म्हणजे 0.77 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केल्याची माहिती हाती आली आहे. वाचा - मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट; आज महाराष्ट्राच्या ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा राज्य सरकारच्या कृषी विभागाने या संदर्भातील अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला. या वेळी पाऊस परिस्थितीचे व शेतीबाबतचे सादरीकरण करण्यात आले. राज्याच्या बहुतांश विभागांमध्ये आकाश कोरडे व निरभ्र होते. कोकण, अमरावती विभागात तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर विभागात अशाच पावसाची नोंद आहे. लातूर, नागपूर विभागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. 9 जूनपर्यंत राज्यात 5.5 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या (62.3 मिमी) 8.8 टक्के इतका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.