जळगाव, 31 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यापासून भाजप आणि खडसे यांच्यात नेहमीच आरोपप्रत्यारोप होत असतात. भाजप नेते गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे यांचा तर नेहमीच कलगीतुरा पहायला मिळत आहे. मात्र, आज एकनाथ खडसे यांच्या मदतीला चक्क भाजप खासदार धावून आले. एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात कापसाचा मुद्दा उपस्थित केला होता. कापसाला भाव नाही, भाव द्या. दोन्ही पक्षाच्या एकानेही कापसाचा हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला असता तर सरकार झुकलं असतं, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. त्या पाठोपाठ आता खासदार रक्षा खडसेही कापसाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत आहे.
खासदार रक्षा खडसे काय म्हणाल्या?
मी मतदारसंघात फिरत असताना वारंवार विषय समोर येत असून कापसाला यावर्षी योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मी सरकारची प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारकडे विषय लावून धरेल आणि राज्य सरकारकडेही या संदर्भात बोलणार आहे. कपाशीला भाव कसा वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिलं आहे. त्यामुळे एक प्रकारे रक्षा खडसे ह्या एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या कापसाच्या मुद्द्यावरून पाठीमागे उभे राहिल्याचं दिसून आलं.
वाचा - अनिल देशमुखांवर बोलण्याआधी..., देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
सरकारकडून भ्रष्टाचारी मंत्री पाठीशी : एकनाथ खडसे
माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिवाळी अधिवेशनात माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाही, असाही आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यामध्ये मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. अधिवेशनात एकमेकांवर आरोप करण्यातच फक्त वेळ गेला असं स्पष्ट बोलत खडसे यांनी हिवाळी अधिवेशनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात अधिवेशन असताना विदर्भाच्या प्रश्नाला न्याय नाही असा थेट आरोप करत एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादकांच्या अडचणीवर भाष्य केलं आहे. कापूस उत्पादकांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. 14 हजाराहून 6000 कापसाचा भाव गेला आहे, त्यावर कुणीही बोलत नाही म्हणत खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे.
हमीभावापेक्षा कापसाला जास्त भाव : गिरीश महाजन
यावर बोलताना भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की सध्या कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव आहे. हमीभावापेक्षा कापूस खाली जाईल, त्यावेळेस शासन कापूस खरेदी करेल. चार-पाच वर्षापासून फेडरेशनमध्ये कापूसच आला नाही. कापूस खरेदी करण्याची शासनाला गरज पडली नाही, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse, Girish mahajan