औरंगाबाद, 23 नोव्हेंबर : राज्यामध्ये थैमान घातलेल्या गोवर आजाराने औरंगाबाद शहरांमध्येही शिरकाव केला आहे. आत्तापर्यंत महापालिका हद्दीमध्ये 59 आणि ग्रामीण भागामध्ये 32 असे एकूण 91 संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यातील संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केलं आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या कचाट्यातून सावरत असतानाच आता राज्यामध्ये गोवर हा आजार थैमान घालत आहे. सुरुवातीला मुंबईमध्ये असलेला हा आजार आता हळूहळू राज्यात पसरलाय. लहान मुलांना या आजाराची लागण होत असल्यानं पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत मुलांमध्ये आजार आढळून आला ताप, सर्दी आढळून आल्यानंतर त्यांची विशेष तपासणी करण्यात येत आहे. मुलांसाठी शहरातील 40 आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येतीय. पालकांनी आपल्या मुलांना या आजारापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. मुलांचे लसीकरण होईल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले.
आजाराची लक्षणं काय? ‘गोवरचा आजार झालेल्या मुलांमध्ये ताप येणे, डोळे लाल होणे, शरीरावर लाल पुरळ दिसणे, खोकला येते, सर्दीमुळे नाक वाहतं राहणे ही लक्षण आढळतात,’ अशी माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली. मुलांमध्ये ही लक्षणं आढळल्यास त्यांनी भरपूर पाणी पिलं पाहिजे. नारळाचं पाणी, वेगवेगळे सरबत, द्रव्य पदार्थ, ताजे फळं यांचा आहारात समावेश असावा. मुलांच्या आहारात अ जीवनसत्वं पुरेशा प्रमाणात असतील याची खबरदारी पालकांनी घ्यावी असं डॉक्टारांनी सांगितलं. हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे 5 नैसर्गिक उपाय गोवरच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभाग हाय अलर्टवर काम करत आहे. महापालिकेनं तीन महिन्यांपासून याबाबतची योग्य ती खबरदारी घेतली असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलाय. या कामाचा भाग म्हणून पालिका तीन महिन्यांपासून ड्रॉप आऊट अँड ड्रॉप लेफ्ट रुग्णांवर काम करत आहे. त्याचबरोबर शहरात विशेष लसीकरणही राबवण्यात आलंय. महानगरपालिकेच्या या मोहिमेमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहन औरंगाबाद महापालिकेकडून करण्यात आले आहे.