अकोला, 13 जून: ग्रामीण अर्थचक्रातील महत्वाचा भाग असलेला आठवडी बाजार (Weekly market) सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे. कोरोना संकटात (Corona crisis) सर्वाधिक फटका आठवडी बाजारांना बसला होता. सध्या छोटे- मोठे माॅल्स, हातगाडे, फेरीवाले किराणा दुकानं यांच्यामुळं आठवडी बाजाराकडं ग्राहकांनी पाठ फिरवल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
अकोला जिल्ह्यात अनेक आठवडी बाजार आहेत. या आठवडी बाजारात ग्रामीण भागातील नागरीक (Citizens in rural areas) खरेदीसाठी येतात. आठवडी बाजार ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा आहे. आठवडी बाजारांच्या निमित्ताने तालुक्यातील फिरते व्यापारी, शेतकरी, दुकानदार आणि विक्रेते यांचा व्यवसाय होतो. बाजारातील भातक्याचं महत्व वेगळच आहे. या भातक्यात शेवचिवडा, पापडी, शंकरपाळे, गाठी शेव, लाल शेव, बारीक शेव, खारी बुंदी अशा अनेक वस्तूंचा समावेश असतो.
हेही वाचा- Career After 12th: मुलींसाठी 'हा' कोर्स अगदी मोफत!, जाणून घ्या SPECIAL REPORT
कोरोना संकटकाळत गर्दीमुळे आठवडी बाजारांवर निर्बंध लादले गेले. परिणामी हातगाडे, फेरीवाले गाव खेड्यात देखील वस्तुंची विक्री करू लागले. ग्राहकांना देखील आपल्या घराबाहेरच वस्तू मिळत असल्याने बाजारातील गर्दी कमी होताना दिसत आहे. आधी बाजारात भरपूर रेलचेल असायची ग्रामीण भागातील नागरीक बाजारातून वस्तू खरेदी करायचे. कपडे, खाण्याच्या वस्तू, महिलांना लागणाऱ्या टिकल्या, बांगड्या, प्रत्येक वस्तूच खरेदी व्हायची. पण आता ग्रामीण भागातील ग्राहकांचा देखील घराबाहेरच वस्तू मिळत आहेत.
कापड व्यापारी नितीन वाडेवाले सांगतात कि, "टाळेबंदीच्या काळानंतर छोट्या व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. ग्राहकांना आता घराबाहेरुन, दुकानात खरेदी करायची सवय पडली आहे. परिणामी आठवडी बाजारात दिवसेंदिवस गर्दी कमी होत आहे. शोरुम्स आणि शहराच्या ठिकाणी जास्त व्हरायटीज पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहकाने आठवडी बाजारकडे पाठ फिरवली आहे. आमचा वडिलोपार्जीत कपड्याचा व्यापार आहे. मात्र, येणाऱ्या काही वर्षात आठवडी बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहेत."
"मी गेल्या 50 वर्षांपासून आठवडी बाजार करतो. सिंदखेड हे माझे मूळ गाव. अनेक गावात आमची कापड दुकाने लागतात पण आता पूर्वीसारखं ना ग्राहक राहिला ना आठवडी बाजार. ग्राहकांना आता भाव कमी पाहिजे, उधार पाहिजे, स्वस्त पाहिजे. ग्राहक आता बोलण्यात लय पटाईत सुद्धा झाली आहेत", असे कापड व्यापारी नानासाहेब टोपरे सांगतात.
आठवडी बाजार म्हणजे काय?
दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय म्हणजे आठवडी बाजार. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात. ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरतात. भारतात जास्त करुन ग्रामीण भागात अजूनही अशा प्रकारचे आठवडी बाजार भरतात. अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.