मुंबई, 26 एप्रिल : 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मोठ्या संघर्षातून आणि 105 भूमिपुत्रांच्या हौतात्म्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झालं.अनेक आव्हानांची सामना करत आज महाराष्ट्र देशातील सर्वात विकसित राज्यांत अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, परंपरा, तंत्रज्ञान इ. सर्वच बाबतीत महाराष्ट्रानं नेत्रदिपक कामगिरी केली आहे. आपल्या महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान नक्कीच आहे, परंतु हा महाराष्ट्र नेमका कसा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया महाराष्ट्राबद्दलच्या खास गोष्टी… महाराष्ट्राचा विस्तार नेमका कसा आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौकिमी आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून ती देशाची आर्थिक राजधानी आहे. तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्राची सीमा छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांशी तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशाशी लागून आहे. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी 720 किमी तर पूर्व-पश्चिम लांबी 800 किमी एवढी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे मासेमारी तसेच जलवाहतूक याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. निरोगी जगण्याचे रहस्य उलगडणे - स्वच्छ भारत स्वस्त भारताकडे कसा नेऊ शकतो
महाराष्ट्राची लोकसंख्या,मतदारसंघ आणि प्रशासकीय रचना-
2011च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,330 एवढी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. 34 जिल्हा परिषद (मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही.)
- तालुके 358
- ग्रामपंचायती 27855
- पंचायत समित्या 351
- महानगरपालिका-27
- नगरपरिषदा 236
- नगरपंचायती-124
- कटक मंडळे 7
महाराष्ट्रात किती मतदारसंघ आहेत?
- विधानसभा मतदारसंघ- 288
- विधानपरिषद मतदारसंघ- 78
- लोकसभा मतदारसंघ- 48
- राज्यसभा मतदारसंघ -19
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग: महाराष्ट्र कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती औरंगाबाद या 6 प्रशासकीय विभागात विभागला आहे.
- कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो.
- पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.
- नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो.
- नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.
- अमरावती- अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो.
- औरंगाबाद- औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं: बुलढाणा जिल्हातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय अजिंठा-वेरुळ लेणी, छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे गडकिल्ले, कास पठार, गेट वे ऑफ इंडिया, विविध व्याघ्रप्रकल्प, अष्टविनायक, ज्योतिर्लिंगे, शक्तीपीठं इत्यादी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहे.महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे.कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून (उंची 1664 मी.) आहे.गोदावरी, कृष्णा, सावित्री, नर्मदा, पंचगंगा, कोयना ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.