मुंबई, 21 फेब्रुवारी : भारतात कोरोना रुग्णांची (Coronavirus in india) घटणारा आकडा आता पुन्हा वाढू लागला आहे. देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं सर्वाधिक आहे आणि या राज्यांमुळेच देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. यामध्ये महाराष्ट्र (coronavirus in maharashtra), केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं या सर्व राज्यांना पत्र दिलं आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, गेल्या काही दिवसांत देशातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. 74 टक्क्यांपेक्षा जास्त केसेस फक्त महाराष्ट्र आणि केरळमधून आहे. त्याशिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्येही दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा देशाच्या सरासरी 1.79 टक्के पॉझिटिव्ही रेटपेक्षाही जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधित 8.10 दर आहे.
हे वाचा - आम्ही बाहेर पडलो तर सरकारच्या अंगलट येईल,माघीला संचारबंदीमुळं वारकरी संतापले
गेल्या चार आठवड्यात महाराष्ट्रातील आठवड्यातील कोरोना प्रकरणं 18,200 वरून 21,300 वर पोहोचली आहेत. आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट म्हणे रुग्ण वाढीचा दर हा 4.7 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील पाच शहरांवर सर्वाधिक लक्ष देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दल्या आहेत. यामध्ये मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई उपनगरातील परिस्थिती खूपच चिंताजन आहे. जिथं आठवड्यातील केसेस 19 टक्क्यांनी वाढली आहेत. याशिवाय नागपूर, अमरावती, नाशिक, अकोला आणि यवतमाळमध्ये आठवड्याला अनुक्रमे 33 टक्के, 47 टक्के, 23 टक्के, 55 टक्के, 48 टक्के प्रकरणं वाढली आहेत.
कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआर स संबंधित जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंधांसह आरटी-पीसीआर टेस्टनंतर रॅपिड अँटिजेन टेस्टदेखील करावी, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. सर्वाधिक प्रकरणं आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये नियमित तपासणी करावी, लक्ष ठेवावं आणि तिथं कठोर असे निर्बंध लागू करावेत. जिथं सर्वाधिक मृत्यू होत आहेत. तिथं आरोग्य व्यवस्थेवर भर द्यावा अशा सूचनाही केंद्र सरकारनं दिल्या आहेत.
हे वाचा - पुण्यात कोरोनामुळे पुन्हा कडक निर्बंध; काय राहणार सुरू आणि काय बंद, वाचा
केद्रीय आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देशात जवळपास 22 दिवसांनी कोरोना रुग्णांची इतकी जास्त संख्या आढळून आली आहे. शनिवारी देशात 13 हजार 993 म्हणजेच जवळपास 14 हजार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याआधी 29 जानेवारीला 18 हजार 855 रुग्ण आढळून आले होते. यानंतर शनिवारची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे.
राज्याबद्दल बोलायचं झाल्यास, देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून येत आहे. शनिवारी राज्यात 6 हजार 281 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसार रोखण्यासाठी मुंबईत आतापर्यंत तेराशेपेक्षा अधिक इमारती सील केल्या आहेत. 5 रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत सील करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आणि संशयित होम क्वारंटाईनमध्ये असतानाही बाहेर वावरताना आढळून आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.