नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे हृदयविकार, डायबेटीस आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढत आहे. आता हे आजार कमी वयातदेखील होत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या पुरुषांची चिंता वाढवणारी आणखी एक माहिती संशोधनातून समोर आली आहे. गेल्या 46 वर्षांत पुरुषांमधला स्पर्म काउंट 50 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या काही वर्षांत यात अत्यंत वेगानं घट होत आहे, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. यात भारतीय पुरुषांचादेखील समावेश आहे. या समस्येकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर येत्या काळात मानवी अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. भारतात यावर आणखी संशोधन होणं गरजेचं आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे. स्पर्म काउंट अर्थात शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने केवळ प्रजननावर परिणाम होणार नाही, तर रिप्रॉडक्टिव्ह पार्टशी संबंधित अनेक घातक आजारांचा धोका वाढू शकतो, असं संशोधकांचं मत आहे. हे संशोधन नेमकं कशा प्रकारे केलं गेलं आणि त्यातले अन्य निष्कर्ष काय आहेत, ते जाणून घेऊ या.
भारतासह जगभरातल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वेगानं कमी होत आहे. संशोधकांच्या एका टीमने सात वर्षं यावर संशोधन केल्यानंतर हा दावा केला आहे. हे संशोधन `ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट` या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. 2011 ते 2018 दरम्यान संशोधकांनी यावर संशोधन केलं. या संशोधनातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
हे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं गेलं. यात संशोधकांच्या अनेक टीम सहभागी झाल्या होत्या. संशोधकांनी 53 देशांमधल्या 57 हजारांहून अधिक पुरुषांच्या शुक्राणूंच्या नमुन्यांच्या आधारे 223 अभ्यास केले. यात दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेतल्या अशा देशांचा समावेश होता जिथं असा अभ्यास यापूर्वी कधीही झाला नव्हता. या भागातल्या नागरिकांचा पहिल्यांदा अभ्यास करण्यात आला आणि तिथल्या पुरुषांमध्ये एकूण शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. याआधी या प्रकारचं संशोधन उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात केलं गेलं होतं आणि तिथेही अशाच प्रकारची आकडेवारी दिसून आली.
संशोधकांच्या टीममधले हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्रा. हेगाई लेव्हीन यांनी `पीटीआय`शी बोलताना सांगितलं, `भारतीय पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वेगानं कमी होत असल्याचं दिसून आलं. ही स्थिती जगभरात सारखीच आहे. वाईट जीवनशैली आणि वातावरणातली घातक रसायनं हे शुक्राणूंची संख्या कमी होण्याचं प्रमुख कारण आहे.`
`मागच्या 46 वर्षांत जगभरातील शुक्राणूंच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं दिसून आलं आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत यात आणखी वेगानं घसरण होत आहे. ही स्थिती एखाद्या महामारीसारखी आहे. कारण सर्वच ठिकाणी हे चित्र दिसत आहे. त्यामुळे इच्छा असूनही आपण त्यापासून दूर जाऊ शकत नाही,` असं हेगाई लेव्हीन यांनी सांगितलं.
`सर्वांना चांगलं वातावरण उपलब्ध झाले पाहिजे,` असं सांगून ते म्हणाले, `मानवासोबतच जगभरातल्या सर्व प्रजाती सुरक्षित राहण्यासाठी त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळालं पाहिजे. तसंच प्रजननक्षमतेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत.`
शुक्राणूंच्या संख्येचा संबंध केवळ प्रजनन क्षमतेशी नाही, तर त्याचा परिणाम पुरुषांच्या आरोग्यावरदेखील होतो. शुक्राणूंची संख्या कमी असल्यास टेस्टिक्युलर कॅन्सरसह (वृषणाचा कॅन्सर) अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे पुरुषांच्या आयुर्मानावरही परिणाम होतो. 2000 सालानंतर शुक्राणूंच्या संख्येत वेगानं घट झाल्याचं दिसून आलं आहे. ही आपल्यासमोरची एक गंभीर समस्या आहे. ही समस्या दूर झाली नाही तर मानवाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. यासाठी भारतात वेगळं संशोधन होणं गरजेचं आहे, असं संशोधकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Disease symptoms, Health, Men, Sperm