मुंबई,23 जून- आज कोपऱ्याकोपऱ्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्या थाटलेल्या दिसतात आणि तेथे गर्दीही प्रचंड असते. बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात; मात्र शरीरासाठी ते अजिबात चांगले नसतात.
हे जंक फूड (Junk Food) म्हणजे आजाराला स्वत:हून दिलेलं आमंत्रण होय. मुलांमध्ये वाढत असलेला जंक फूडचा ट्रेंड हा सर्वत्र चिंतेचा विषय असून, त्यापासून त्यांना रोखायचे कसं, हा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. शाळांनी मुलांच्या डब्यात जंक फूडला बंदी घातली असली, तरी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरांवरच्या विद्यार्थ्यांमध्ये जंक फूडची आणि शीतपेयांची (Cold Drinks) आवड वाढत असल्याचं चित्र आहे. शीतपेयांमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण खूप धोकादायक असतं.
या पदार्थांची सवय लागते आणि भुकेवर नियंत्रण राहत नाही. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे, की जंक फूडच्या अति सेवनाने शरीरातल्या इन्सुलिनची (Insulin Level) पातळी गरजेपेक्षा जास्त वाढते आणि व्यक्तीची प्रतिसाद देण्याची शक्ती मंदावते. मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक वाढीवर मोठा परिणाम होतो. शिवाय लहान वयातच हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा असे विविध आजार जडू शकतात.
निरोगी आरोग्यासाठी समतोल, सकस आहार (Balanced Diet) आवश्यक आहे. जंक फूडमध्ये फायबर्स, जीवनसत्त्वं किंवा प्रोटीनसारखे नैसर्गिक घटक नसतात. ते खाल्ल्याने सुस्ती येते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक घटकांची गरज यातून पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक आजार मुलांना कमकुवत करतात.
'मॉम्स जंक्शन'मधल्या माहितीनुसार, जंक फूड खाल्ल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. यासोबतच जंक फूडचं सेवन ही मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत हानिकारक गोष्ट आहे.
(हे वाचा:ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या )
जंक फूडचे दुष्परिणाम
- जंक फूडमध्ये मीठ, साखर, ट्रान्स फॅट्सचं (Trans Fats) प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे अनेक शारीरिक आजार होऊ शकतात.
- जंक फूडमधल्या अतिरिक्त सोडियममुळे (Sodium) रक्तदाब वाढतो. त्यामुळे रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.
- जंक फूड खाल्ल्याने आळस आणि थकवा येतो.
- जंक फूडमुळे एडेमा हा आजार होऊ शकतो. त्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका असतो.
- मुलांमध्ये संप्रेरकांच्या असंतुलनाची (Hormonal Imbalance) समस्या उद्भवू शकते.
- कोला, सोडा प्यायल्याने रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढू शकतं.
- लठ्ठपणा येतो आणि मुलांना हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.
- मुलांची पचनक्रिया बिघडते.
- मुलांची हाडं आणि दातांवर वाईट परिणाम होतो.
सर्व आजारांपासून मुलांना दूर ठेवण्याची गरज असून चांगल्या आरोग्यासाठी भाज्या, कडधान्यं, तृणधान्यं अशा सर्वसमावेशक संतुलित आहाराची सवय लावणं गरजेचं बनलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Junk, Lifestyle