
आयआयटीमधील अनेक प्रतिभावंत जगभर आपला ठसा उमटवत आहेत. यावरुन ही संस्था विद्यार्थ्यांना कसं घडवत असेल याची प्रचिती येते. एक नाही तर असे हजारो विद्यार्थी अमेरिकेत आणि इतर देशांमध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत असून नवनवीन शोध लावत आहेत. आयआयटीच्या सुरुवातीची कहाणी खूपच रंजक आहे. आयआयटीचा हा पहिला कॅम्पस होता, जो बंगालमधील खरगपूरमध्ये उघडला गेला होता. हिजलीपूर जेल बिल्डिंगमध्ये हा उघडण्यात आला होता.

खरंतर स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच भारतात उच्च शिक्षणासह तांत्रिक महाविद्यालयाची गरज भासत होती. त्यावेळी 22 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यांच्या शिफारशींच्या आधारे, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर देशातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंगालचे मुख्यमंत्री बीसी राय यांच्या सूचनेवरून तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी 1950 मध्ये खरगपूर येथे त्याची पायाभरणी केली.

वर्षभरानंतर ते सुरू झालं. त्यानंतर आयआयटी खरगपूर कायदा संसदेत मंजूर करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नेहरू 1956 मध्ये पहिल्या दीक्षांत समारंभाला गेले तेव्हा त्यांनी सांगितले की ही शिक्षण संस्था भारताचे भविष्य बनेल. मात्र, येथील प्रतिभावंत सर्रास परदेशात जातात ही वेगळी बाब आहे. IIT खरगपूरनंतर 1958 मध्ये मुंबई, 1959 मध्ये मद्रास आणि कानपूरमध्ये IIT कॅम्पस उघडण्यात आले. दिल्लीमध्ये 1961 मध्ये याची सुरुवात झाली.

या अशा शैक्षणिक संस्था आहेत, ज्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळणे ही राष्ट्रीय अभिमानाची बाब मानली जाते. केवळ भारतच नाही तर जगभरातील विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतात. देशात आयआयटीची संख्या आता 23 झाली आहे. तरीही या 5 जुन्या IIT अजूनही अतुलनीय मानल्या जातात. यामध्ये खरगपूर कॅम्पस 2100 एकरमध्ये पसरलेला असून सर्वात मोठा आहे. तर सर्वात लहान कॅम्पस दिल्ली आयआयटीचा आहे, जो 325 एकरमध्ये आहे.

या संस्थांच्या उत्कृष्ट बौद्धिक शैक्षणिक पातळीमुळे देशभरात आणि अगदी आशिया खंडातील विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा आहे. या संस्थांमध्ये पदवीपूर्व स्तरावर प्रवेश संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (JEE) आधारावर होतो. ही परीक्षा अत्यंत अवघड मानली जात असून, त्याची तयारी करण्यासाठी देशभरात हजारो 'कोचिंग क्लासेस' चालवले जात आहेत.

मात्र, आयआयटी संस्थांवर टीका होत असते. असे मानले जाते की भारतातील गरीब लोक पैसे कमावण्याच्या लोभापोटी देश सोडून अमेरिकेसह इतर देशांमध्ये जातात, त्यामुळे भारताला बौद्धिक संपदेचा लाभ मिळू शकलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.