मुंबई, 23 मार्च- छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही विनोदी मालिका गेली 13 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय बनली आहे. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या मालिकेची भुरळ पडली आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा फारच लोकप्रिय झाली आहे. त्यातल्या त्यात दयाबेन (Dayaben) आणि जेठालाल (Jethalal) यांची प्रसिद्धी तर अफाट आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून दयाबेन मालिकेत दिसलेली नाही. त्यामुळे चाहते फारच निराश आहेत. परंतु आता दयाबेन मालिकेत का परतली नाहीय याचं उत्तर स्वतः जेठालालनेच दिलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सतत चर्चेत असते. त्यामुळेच यातील कलाकारसुद्धा चर्चेत येतात. तारक मेहतामध्ये दयाबेन ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकारली आहे. दिशा वकानीची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना जबरदस्त पसंत पडली आहे. दयाबेनचा अभिनय आणि भोळसर विनोद ऐकून प्रेक्षक पोट धरून हसू लागतात. त्यामुळेच मालिकेत दयाबेनला पाहणं म्हणजे प्रेक्षकांना मेजवानीच असते. परंतु चार वर्षांपासून दयाबेन अर्थातच दिशा वकानीने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
नुकतंच टेलिकास्ट झालेल्या एका एपिसोडमध्ये चक्क जेठालालने दयाबेनच्या परत न येण्याचं कारण सांगितलं आहे. या एपिसोडमध्ये अब्दुलच्या दुकानात सोडा पिण्यासाठी जेठालाल आणि सर्व गोकुलधाम मंडळी एकत्र आलेली असते. यावेळी सर्वजण गप्पा मारत असतात.दरम्यान दयाबेनचा विषय निघतो. आणि यावेळी जेठालाल म्हणतो, ‘मी जेव्हा दयाला अहमदाबादवरुन आणायचा प्रयत्न करतो, तेव्हा ती सासूबाईंसोबत यात्रेला निघून जाते. यात्रेवरून आल्यानंतर कोरोनाची लाट सुरु होते. लाट ओसरली की हे लोक पुन्हा यात्रेवर निघून जातात. त्यामुळे प्रत्येकवेळी राहून जातं. आता हा मालिका पुढे ढकलण्यासाठीचा प्रयत्न आहे. परंतु रिअलमध्ये दयाबेन कधी परतणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दयाबेन अर्थातच दिशा वकानीने आपल्या प्रेग्नेसीसाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु त्यांनतर अजूनही अभिनेत्री मालिकेत परतली नाहीय. निर्मात्यांकडे सुरु असलेल्या मानधन आणि शूटिंग वेळेबाबतच्या मागण्या हे परत न येण्याचं कारण मानलं जातं. परंतु मालिकेत अजूनही कोणत्याच नव्या अभिनेत्रीने दिशाची जागा घेतलेली नाहीय. त्यामुळे दिशा कधी परतणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.