मुंबई, 5 जानेवारी- ‘अनाथांची माय’ आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांनी काल या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वच लोक खिन्न झाले आहेत. प्रत्येकजण सोशल मीडियावरून त्यांना आदरांजली वाहत आहे. अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत, आपलं मन मोकळं केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री आणि ऑनस्क्रीन सिंधू (On Screen Sindhu) म्हणून जिला ओळखलं जातं ती म्हणजे तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) होय. तेजस्विनीने काही वेळेपूर्वी एक भलीमोठी पोस्ट लिहीत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितला सिंधुताई सपकाळ फार जवळच्या होत्या. त्यांच्याशी तिचं एक खास नातं बनलं होतं. कारण तेजस्विनीने त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास स्वतः पडद्यावर जगला आहे आणि आपल्या अभिनयातून तो जिवंत केला आहे. तेजस्विनी पंडितनं 2010 मध्ये आलेल्या ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारली होती. सिंधुताईंच्या जाण्याने तेजस्विनीला मोठा धक्का बसला आहे. स्वतःला सावरत अभिनेत्रीने सर्वांनाच भावुक करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तेजस्विनी पंडितची पोस्ट- ‘अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही केलं ?पटकन judge करतो ना आपण त्यांच्या social media वरुन माणसाला ?पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो ?!माझीही काहीशी अशीच अवस्था झाली.रात्री ममता ताईच्या ph वरुन बातमी confirm झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते.खूप वेळ ph वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती.माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या.
“मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस !“अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला.आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई.महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील. “लोकहो एक विनंती….घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात, त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death.तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो. ओम शांती.माई….💔- तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई”. अशी पोस्ट लिहीत तेजस्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.