मुंबई, 12 एप्रिल- मनोरंजनसृष्टीत नेहमीच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर भाष्य करणारे चित्रपट बनवले जातात. असे चित्रपट लोकांच्या पसंतीसदेखील उतरतात. मराठीमधील असाच एक चित्रपट म्हणजे ‘सिंहासन’ होय. या सिनेमाने आजही प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. 1979 मध्ये आलेल्या या चित्रपटाला नुकतंच 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी असा एक किस्सा सांगितला जो आता चर्चेचा विषय बनला आहे. काल मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ लेखक जब्बार पटेल, लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर, खासदार सुप्रिया सुळे अशा दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात राजकीय आणि ‘सिहांसन’ सिनेमाशी निगडित अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेक माहिती नसलेले किस्से या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना ऐकायला मिळाले. (हे वाचा: Sai Tamhankar: ‘मी वडिलांवर अंत्यसंस्कार केलं आणि..’, सई ताम्हणकरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग ) दरम्यान या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनीसुद्धा एक नवाकोरा किस्सा सांगितला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, नाना पाटेकर यांना रोखठोक स्वभावासाठी ओळखलं जातं. नाना आपले विचार आपली मते नेहमीच परखडपणे मांडत असतात. शिवाय आपल्याला एखाद्या गोष्टीबाबत काय वाटतं हेदेखील ते बिनधास्तपणे सांगत असतात. या कार्यक्रमात बोलतांना नाना पाटेकर म्हणाले, ‘‘एक काळ असा होता की, मी नसिरुद्दीन शहा यांचा अपघात व्हावा असा देवाकडे नवस केला होता. त्यांचा अपघात व्हावा त्यांचा हात किंवा पाय मोडावा असं मी म्हणत असे. याचं कारण असं होतं की, त्यांच्याकडे असलेल्या भूमिका मला मिळाव्या. पण असं कधीच झालं नाही. आणि त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला असंही त्यांनी म्हटलं आहे. हा किस्सा त्यांनी मजेशीर अंदाजात व्यक्त केला.शिवाय त्यांनी असंही म्हटलं की, जे ज्याच्या नशिबात आहे ते त्याच्याच पदरी पडतं. मला नंतरच्या काळात देवाने खूप काही दिल्याचा उल्लेख येथे त्यांनी केला आहे.
नाना आणि नसिरुद्दीन शहा हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्याकाळात नसिरुद्दीन शहा यांच्याकडे प्रचंड काम होतं. त्यांचे अनेक चित्रपट गाजत होते. दिग्दर्शक त्यांना आपल्या सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असायचे. त्यांची हटके शैली लोकांना पसंत पडत होती. नाना पाटेकर यांच्याबाबत बोलायचं झालं तर नानांनीसुद्धा अनेक दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. गंभीर भूमिकांपासून ते विनोदी भूमिकापर्यंत त्यांनी प्रत्येक जॉनरमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे.