मुंबई, 16 मार्च : मराठी मधील सर्वात लोकप्रिय मालिका ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेने प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या मालिकेतील श्री आणि जान्हवी या जोड़ीला विशेष पसंती मिळत होती. याच मालिकेतून शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घराघरात पोहचले. तेजश्रीचा ‘काहीही हा श्री’ या डायलॉगने तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती त्यामुळे या जोडीने खऱ्या आयुष्यात पण जीवनसाथी व्हावे असे प्रेक्षकांना वाटत होते आणि योगायोग म्हणजे ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. तेजश्रीचा साखरपुडा इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे यांच्याशी ठरला होता. दरम्यान तेजश्री आणि शशांक यांचं प्रेमप्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी हा साखरपुडा मोडला आणि 8 फेब्रुवारी 2014 रोजी या दोघांनी लग्न देखील केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यांच्या नात्यात इतका दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते.
मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. शशांकने या अर्जात असं लिहलं होतं तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते. वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून हिणवून मानसिक छळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्याने सांगितलं असल्याचं बोललं जातं. त्यांच्या घटस्फोटानंतर लवकरच ही मालिका संपवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची मैत्रिण प्रियांका हिच्यासोबत 2017 रोजी दुसरं लग्न केलं. तेजश्री अद्याप सिंगल आहे. मात्र आपल्या घटस्फोटाबद्दल या दोघांनी अद्याप उघड प्रतिक्रिया दिलेली नाही.
काही दिवासांपूर्वी सुजय डहाकेच्या वादग्रस्त वक्तव्यावरून हे दोघही पुन्हा एकदा चर्चेत आले. होतं. मराठी मालिकांमध्ये फक्त ब्राह्मण मुलीच मुख्य भूमिका साकारतात असं वक्तव्य सुजयनं केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट खूप व्हायरल झाल्या होत्या. सध्या तेजश्री झी मराठीच्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत काम करत आहे तर शशांक कलर्स मराठी वरील हे मन बावरे या मालिकेत दिसत आहे.