प्रतिनिधी-विजय वंजारा मुंबई, 20 मे- बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा दावा करणाऱ्या दिल्लीतील महिलेला मुंबईतील न्यायालयाने नुकतंच समन्स बजावला आहे. तसेच 15जूनला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर हत्येचा दावा करत या महिलेने खळबळ माजवली होती. तसेच या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. ‘माझे पती सतीश कौशिक यांचे दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॉक्टरांनी तसा अहवालही दिला आहे. मात्र, या महिलेच्या चुकीच्या दाव्यामुळे त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. यामुळे आरोपींविरोधात कारवाई करावी’, अशी तक्रार कौशिक यांची पत्नी शशी यांनी अडव्होकेट मधुकर दळवी यांच्यामार्फत न्यायालयात केली आहे. आपल्या विभक्त पतीने कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करता आली नसल्यानेच त्याने कौशिक यांची हत्या केली’, असा दावा सान्वी मालू या महिलेने केला होता. दिल्लीतीलच राजेंद्र छाबर या वकिलानेही अशा आशयाची मुलाखत दिल्याचा आरोप आहे. . महानगर न्यायदंडाधिकारी ए. आय. शेख यांनी तक्रारीची दखल घेऊन प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून सान्वी व राजेंद्र यांना समन्स बजावले आहे. (हे वाचा: Sameer Wankhede: शेवटच्या क्षणी जोडण्यात आलं शाहरुखच्या लेकाचं नाव, महागडी घड्याळे, फॉरेन ट्रिप्सबाबत काय म्हणाले वानखेडे? ) सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी एका महिलेने खळबळजनक दावा होता. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती की, तिच्या पतीने सतीश कौशिक यांची 15 कोटी रुपयांसाठी हत्या केली होती.दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेने हा दावा केला होता.कौशिक पैसे परत मागत होते, जे पती देऊ इच्छित नव्हते, असा आरोप महिलेने केला होता. कौशिक यांची हत्या पतीनेच औषध देऊन केली, असा आरोप तिने केला होता.
तिने दावा केला की, 23 ऑगस्ट 2022 रोजी कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते. त्यांनी पतीकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, “मी ड्रॉईंग रूममध्ये हजर होते जिथे कौशिक आणि माझे पती दोघांच्यात वाद झाला. कौशिक म्हणत होते की मला पैशाची नितांत गरज आहे. पैसे देऊन तीन वर्षे उलटली आहेत. कौशिक यांनी गुंतवणुकीसाठी माझ्या पतीला 15 कोटी रुपये दिले होते. मात्र, कौशिक म्हणत होते, की कोणतीही गुंतवणूक केली नाही किंवा त्यांचे पैसेही परत दिले नाहीत, त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे बोलत होते.