मुंबई, 14 ऑक्टोबर: पायल घोष आणि ऋचा चढ्ढा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे असं दिसून येत आहे. या दोघींमध्ये समझोता झाला आहे. मुंबई हायकोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान दोघींच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. ऋचाविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत पायल घोषने रियाची माफी मागितली आहे.
अभिनेत्री ऋचा चढ्ढा (Richa Chadda)ने पायल घोष (Payal Ghosh )विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. पायल घोषने अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. अनुरागने 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केलं, असं पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटलं होतं. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पायलने आपल्याविरोधात अयोग्य शब्द वापरले, असा दावा करत ऋचाने एक कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा केला होता. याआधी सोशल मीडियावर पायलने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये ती असं म्हणाली होती की, "मी कुणाचीही माफी मागणार नाही. ऋचाबद्दल मी काहीही वाईट बोलले नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. पण आज पायलने चक्क ऋचाची माफी मागून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. रिचाने केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. पायलने केलेल्या वक्तव्याबद्दल तिने ऋचाची माफी मागितली आहे. आता या दोघींमधला वाद खरंच मिटणार का? आणि अनुराग कश्यपवर पायलने केलेल्या आरोपाबाबत पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.