मुंबई, 6 जुलै- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण प्रेक्षक आजही या मालिकेला यातील कलाकारांना मिस करताना दिसतात. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, मायरा वायकुळ या कलाकारांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ही कलाकार मंडळी पुन्हा एकदा एकत्र यावीत अशी प्रेक्षकांची ईच्छा आहे. त्यासाठी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा दुसरा भाग यावा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. यावर नुकतीच अभिनेता श्रेयस तळपदेने एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका पुन्हा नव्याने भेटीला येणार का, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. संकर्षण, प्रार्थना, श्रेयस आणि मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर या चौघांनी एकत्र प्रोजेक्ट करणार असल्याचे जाहीर केले होते. पण तो नवा प्रोजेक्ट काय असेल हे त्यांनी गुपित ठेवलेले होते. त्यानंतर ही सगळी टीम आपापल्या कामाला लागली. इकबाल चित्रपटानंतर श्रेयस तळपदे आणि प्रतीक्षा लोणकर आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त पुन्हा एकत्र आली. वाचा- एअर होस्टेस असलेली सोनम बाजवा कशी बनली पंजाबची टॉप अभिनेत्री या सेटवर श्रेयसने एक गुपित उलगडत, माझी डार्लिंग माझ्या भेटीला आली असे म्हणत नुकताच सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना श्रेयस म्हणतो की, वो घडी जिसका आप सभी को इंतजार था. आमची ही रेशीमगाठ कधीही तुटायची नाही! असे म्हणत तो त्याच्या चाहत्यांचे उत्सुकता वाढवताना दिसतो.
श्रेयसची डार्लिंग म्हणजे प्रार्थना बेहरे असावी असा सगळ्यांनी अंदाज बांधलेला असतो.तेवढ्यात तिथे अजय मयेकर असल्याचे तो जाहीर करतो. चित्रपटाच्या सेटजवळच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांचा नवीन प्रोजेक्ट चालू आहे. त्यानिमित्ताने श्रेयसची अजय सोबत भेट घडून आली. याचवेळी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचे दुसरे पर्व सुरू व्हावे, अशी श्रेयसने इच्छा व्यक्त केली मात्र प्रार्थनाकडे डेट नाहीत ही खंत तो बोलून दाखवतो.
तेव्हा प्रार्थना या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हणते की, तुमच्या दोघांसाठी मी कधीही डेट्स द्यायला तयार आहे. ही मज्जा अनुभवायला मी तिथे असायला हवी होते असे प्रार्थना म्हणते. या कलाकारांसोबत आनंद काळे, स्वाती देवल यांनीही मजेशीर प्रतिक्रिया देत आम्हीही मालिकेत काम करण्यासाठी उत्सुक आहोत असे म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील ही मालिका पुन्हा सुरू व्हावी, असं वाटू लागलं आहे. या मालिकेचा चाहता वर्ग मोठा आहे.