मुंबई, 29 जुलै- किरण माने आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. त्यांचा सोशल मीडियाचा वावर रोजचा असला तरी त्यांची प्रत्येक पोस्ट ही कोणत्या ना कोणत्या विषयावर भाष्य करणारी असते. कधी कौतुक तर कधी खटकणाऱ्या गोष्टीवर किरण माने स्पष्टचं बोलताना दिसतात. या सगळ्याचा फटका त्यांना अनेकदा बसतो. अनेकदा यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलीसाठी एक कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी काही असे मुद्दे मांडले आहेत, ज्यामुळं ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. शरद पोंक्षे यांची मुलगी वैमानिक झाली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली. त्यांनी आपल्या मुलीचं कौतुक करताना आरक्षणाचा उल्लेख केला होता. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टनंतर आता यावर विविध प्रतिक्रिय येऊ लागल्या आहेत. पण किरण माने यांनी या पोस्टमध्ये शरद पोंक्षे यांच्या लेकीचं कौतुक तर केलंच आहे पण वास्तवाची देखील जाणीव करून दिली आहे. यासोबतचठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. “तुमच्या लेकीचं मनःपूर्वक अभिनंदन. लेक कुणाचीही असो तिचं कौतुक झालंच पाहिजे. पण शरदराव कौतुक करतानासुध्दा माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहोत हे दाखवायलाच हवे का?, असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. वाचा- अभिनेत्रीचं ७५ वर्षीय वृद्धासोबत धक्कादायक कृत्य; ब्लॅकमेल करत उकळले 11 लाख किरण माने यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करीयरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील… घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्या हादर्याची आत्तापासून तयारी कर… जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल… जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल ! ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल… ताजीकिस्तानमधल्या ड्युशान्बेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल… स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, माॅरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरीया जाशील तिथे गांधी,गांधी आणि गांधीच असेल…. इंग्लंडमध्ये लंडन,वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल… अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल ! गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील… …हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल. अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल.. लंडनला सर्वांगसुंदर डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! हंगेरीला डाॅ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील… कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डाॅ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील… लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्येही डाॅ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल.
या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डाॅ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील ! काहीजण ‘Annihilation of Caste’ वाचत असतील, तर काहीजण ‘The Untouchables: Who were they and why they Became Untouchables’ ची पारायणं करत असतील ! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं… गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यन्त पोहोचलेत अशीही चौकशी करतील… त्यांना हे सांगू नकोस की ‘मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत…’ अजिबात सांगू नकोस हे… कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग ‘सगळं ठीक आहे आमच्याकडे आता.’
…नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त ‘माणूस’ दिसेपर्यन्त विचार करत रहा ! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात,धर्म,वंश,रंग,प्रांत,देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात !! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे ‘मानवता’. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी…तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ! ❤️