नवी दिल्ली 14 सप्टेंबर: अभिनेत्री कंगना रणौत मुंबईवरून चंदिगडला गेली आहे. मात्र त्यानंतरही तिच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनाने पुन्हा आरोप केले आहेत. सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधले माफिया, ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्याच बरोबर या सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे. हे सगळं उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला असल्याचंही कंगनाने म्हटलं आहे. दरम्यान, कंगना प्रकरण हे आता आमच्यासाठी बंद झाल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. मात्र या प्रकरणातल्या सर्व घडामोडींवर आमचं लक्ष असल्याचं सूचक वक्तव्य रविवारीच खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. मी या सगळ्यांची हे उद्योग उघड केल्यानेच ते मला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पाहूया नेमकं कोण जाळ्यात अडकतं ते असंही कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Basic problem of Maharashtra CM is why I exposed movie mafia, murderers of SSR and its drug racket, who his beloved son Aaditya Thakeray hangs out with, this is my big crime so now they want to fix me, ok try let’s see who fixes who!!! https://t.co/KzfVPfx5s8
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
दरम्यान, शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावलं आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर (POK)वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं राहावं. कंगनानं आपला बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल आम्ही ऐकून घेणार नाही. कंगनाचं आपलं बस्तान उचलावं हेच योग्य ठरेल, अशा शब्दांत अनिल परब यांनी इशारा दिला आहे. अनिल परब म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फक्तं कंगनालाच का भेटावं, मुंबईत इतरही गरीबांची अनधिकृत बांधकामं पडत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या गरीबांनाही भेटलं पाहिजे, अशा टोला देखील लगावला. बेकादेशीर काम करणाऱ्यांना राज्यपाल भेटत असत असतील, तर फक्त कंगनाला का भेटता? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं, असंही परब यांनी यावेळी सांगितलं.