मुंबई, 7 मे- सध्या सगळीकडं ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमानं कोट्यावधींचा गल्ला कमावला आहे. तर दुसरीकडं ‘TDM’ सारखा चित्रपट शो ं मिळाल्याने बंद करावा लागला. त्यामुळे मराठी चित्रपटांविषयी सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. अनेकदा मराठी सिनेमानं शो मिळत नाहीत, यावरून चर्चा रंगलेली पाहण्यासम मिळते. नुकताच ‘तेंडल्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी एक सणसणीत पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आली आहे. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतीच त्यांनी मराठी सिनेमासाठी एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘सिनेमा’ अस्स्सा असतो भावा ! नादखुळा !! मराठी सिनेमाला ‘फॅंड्री’नं ज्या उंचीवर नेउन ठेवलंवतं, तिथून आणखी सात मजले वर नेऊन ठेवलाय ते ‘तेंडल्या’नं. मी हे विधान अतिशय जबाबदारीनं करतोय. सचिन जाधव-नचिकेत वाईकर ही दिग्दर्शक ही जोडी येत्या काळात मराठी सिनेमाला ‘सोन्याचे दिस’ दाखवण्याची ताकद असणारी आहे, यात शंका नाही. ..लै दिवस मी एका प्रश्नावर मनापास्नं विचार करत होतो. मोठमोठ्या नांववाल्या दिग्दर्शकांशी यावर वादबी घातलाय : ‘उत्तम आणि लोकप्रिय मराठी सिनेमा बनवायला काय लागतं?’…बोगस कथानकावर प्रचंड पैसा ओतून प्रेक्षकांवर दणादणा प्रसिद्धीचा मारा करणारा निर्माता? असा ‘बकरा’ गळाला लागलाय म्हणून अर्धवट लिहिलेल्या स्क्रिप्टवर घाईघाईत सिनेमा बनवणारा दिग्दर्शक? सुमार अभिनय असला तरी मोठ्ठं नांव असलेले ‘स्टार्स’??? की गुंतवुन टाकणारं, काळजाला हात घालणारं, मनामेंदूत घर करणारं कथानक… नांव नसलेले पण जीव ओतून काम करणारे प्रतिभावान अभिनेते… वेळ घेऊन कथा-पटकथेतील बारकाव्यांवर नीट काम करून, अभ्यास करून पडद्यावर नितांतसुंदर चित्र साकारणारा दिग्दर्शक??? वाचा- ऐश्वर्या रायच्या गंभीर आरोपांवर सलमानने दिलेलं असं उत्तर; म्हणाला ‘मी मारलं असत मराठीत पहिला पर्याय असलेल्या सिनेमांचा सुळसुळाट आहे गेली कित्येक वर्ष… दुसरा पर्याय मात्र दुर्मिळ. त्यासाठी कुणी निर्माता तयार नसतो. बजेट कमी, अनोळखी कलाकार वगैरेंमुळे त्या सिनेमाची पुरेशी प्रसिद्धी होत नाही. त्यामुळे प्रेक्षक येत नाहीत, असं त्यांचं मत आहे. वाईट वाटायचं. उत्तम कथेची उत्तम मांडणी आणि नवोदितांचा तगडा अभिनय असलेला सिनेमा चालायला हवा असं कळकळीनं वाटायचं.
अशातच आज ‘तेंडल्या’ पाहिला ! काय सांगू गड्याहो… ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अवस्था झाली !! तळमळीनं वाटलं की सगळ्या मराठी मुलखातल्या सिनेमाप्रेमींना लाऊडस्पीकरवर ओरडून सांगावं की भावाबहिणींनो, ‘तेंडल्या’ नक्की बघा… आवर्जुन बघा… शो कुठे आहेत ते शोधुन काढा… लांब असेल तर वाट वाकडी करून जा पण बघाच… मनमुराद हसाल, रडाल, टाळ्या वाजवाल, हरवून जाल… आणि थेटरातनं बाहेर पडताना लाखमोलाचं कायतरी घेऊनबी याल…
आपलं हरवलेलं हवंहवंसं, लोभस, रंगीबेरंगी बालपण परत अनुभवावं असं प्रत्येकाला वाटतं… ती संधी देणारा ‘तेंडल्या’ हा भन्नाट, जबराट, नादखुळा पिच्चर आहे. मराठीत एक अशी कलाकृती आलीय, जी फॅमिलीला सोबत घेऊन, पैसे खर्चून, थिएटरमध्ये जाऊन, स्वत:भोवती अंधार करून, एका रम्य विश्वात हरवून जाण्याचा आनंद लुटत पहा..जिच्यातनं स्वप्नं पूर्ण करण्यासाठीचं वेडेपण कायमचं काळजात कोरून घ्या… मराठीतली सुमारांची सद्दी संपवायला लै टॅलेंटेड पोरं सज्ज आहेत, त्यांना बळ द्या.