सुधीर जैन, प्रतिनिधी रतलाम, 17 मे : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली. यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. रतलामच्या आलोट शहरातील तळोद गावातील ही घटना आहे. आई-वडिलांमध्ये सुरू असलेल्या वादाची माहिती मृत दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी पोलिसांना दिली, तेव्हा त्यांना याबाबत धक्काच बसला. मिळालेल्या माहितीनुसार, पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून त्यांच्यात रोज भांडणे व्हायची. यातूनच मग 40 वर्षीय पती बाळू सिंह याने पत्नी तेजूबाईचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. तसेच पत्नीचा खून केल्यानंतर पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी नातेवाईकांनी खिडकीतून आत डोकावले असता ही धक्कादायक घटना समोर आली. बाळू सिंगचा मृतदेह फासावर लटकलेला होता, तर त्याची पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती.
घटनेच्या वेळी त्यांची दोन्ही मुले घरी उपस्थित नव्हती. ते त्यांच्या आत्या आणि मामाच्या घरी गेले होते. पोलिसांनी मुलांची चौकशी केली असता घटनेचे खरे कारण समोर आले. मुलांनी पोलिसांना सांगितले की, वडील आईच्या चारित्र्यावर संशय घेत असत. दारू पिऊन ते त्यांच्याशी भांडत असत. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की वडिलांनी चारित्र्याच्या संशयावरून आईचा जीव घेतला. यानंतर, त्यांनी स्वत:ही आत्महत्या केली. माहिती मिळताच, पोलीस एफएसएल पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दरवाजा तोडून पती-पत्नीचे मृतदेह आलोट येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याप्रकरणी आलोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.