नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: : यंदा सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा (CBSE Board Exam) दोन्ही टर्ममध्ये घेतल्या जाणार आहेत. इयत्ता 10 वीच्या मायनर विषयांची टर्म वन परीक्षा सुरू झाली असून, मेजर (Major) अर्थात महत्त्वाच्या विषयांची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. इयत्ता 12 वीच्या टर्म 1 बोर्ड परीक्षा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू होतील. 2022 मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सध्या विद्यार्थी जोरात तयारी करत आहेत. बहुतांश विद्यार्थी परीक्षेदरम्यान नकळतपणे कोणत्या सर्वसामान्य चुका (How to avoid Mistakes in exam) करतात, त्याविषयी जाणून घेऊ या.
बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थी अशा काही चुका करतात, की त्यांच्यासाठी तो चिंतेचा विषय ठरतो. यात अशा काही सर्वसामान्य चुका असतात, की ज्या नकळतपणे आणि दबावामुळे विद्यार्थ्यांकडून होतात; मात्र या चुका तुम्ही सुधारू शकता. यामुळे तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत आणि स्कोअरही चांगला होईल.
1) प्रश्नपत्रिका (Question Paper) काळजीपूर्वक न वाचणे : विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देताना प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचत नाहीत. त्यामुळे नेमका प्रश्न काय आहे, हे त्यांना समजत नाही. अशा वेळी प्रश्नाचं उत्तर येत असूनही विद्यार्थी काही प्रश्न सोडून देतात किंवा वगळतात. काही विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देताना नर्व्हसदेखील (Nervous) होतात.
अशी करा सुधारणा : प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती प्रथम काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर कोणत्या प्रश्नांची उत्तरं आपण योग्य आणि व्यवस्थित लिहू शकतो, याचा निर्णय घ्यावा. ज्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत, असे प्रश्न प्राधान्यानं सोडावावेत. ज्या प्रश्नांच्या उत्तरांची खात्री नाही, अशा प्रश्नांवर काही वेळानंतर काम करावं.
2) हस्ताक्षरावर लक्ष केंद्रित न करणं : बोर्डाच्या परीक्षेत हस्ताक्षरासाठीदेखील (Hand Writing) मार्क्स असतात ही गोष्ट अनेक विद्यार्थांना ठाऊक नसते. त्यामुळे वेळेवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी घाईघाईत उत्तरं लिहीतात. त्यामुळे हस्ताक्षराकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही.
अशी करा सुधारणा : खराब हस्ताक्षरात उत्तर लिहिल्यास मार्क्स (Mark) कापले जातात. त्यामुळे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनी आपल्या हस्ताक्षराकडेही लक्ष द्यावं. आपलं लेखन असं असावं, की उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीला ते सहज वाचता यावं.
Exam Tips: तुम्हालाही बोर्डाच्या परीक्षेत Merit मध्ये यायचंय? मग या गोष्टी कराच
3) काही प्रश्नांमध्ये गुंतून राहणं : ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत किंवा येत नाहीत, अशा प्रश्नांना विद्यार्थी अधिक वेळ देताना दिसतात. त्यामुळे ते बराच काळ ठरावीक प्रश्नांतच गुंतून राहतात.
अशी करा सुधारणा : ज्या प्रश्नांची उत्तरं येतात, असे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. यामुळे तुमचा वेळ निश्चितच वाचेल.
4) रिव्हिजनसाठी (Revision) पुरेसा वेळ न देणं : अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर उत्तरपत्रिका (Answer Sheet) आणि प्रश्नपत्रिका पुन्हा तपासत नाहीत. प्रश्नपत्रिका पुन्हा तपासून पाहिल्यास, तिची रिव्हिजन केल्यास शेवटच्या क्षणी एखादी चूक सुधारता येऊ शकते.
अशी करा सुधारणा : उत्तरपत्रिका जमा करण्यापूर्वी ती एकदा क्रॉसचेक करावी. यामुळे काही चुका राहिल्या असतील, तर त्या सुधारता येऊ शकतात. तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर ते एकदा काळजीपूर्वक वाचावं. यामुळे राहिलेली चूक सुधारता येते, तसंच काही शब्द राहिले असतील तर दुरुस्त करण्याची संधी मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.