बेगूसराय, 2 मे: कोरोनामुळे सर्वांसाठी अतिशय खास असलेल्या लग्नसमारंभासाठीही अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. लग्न कमी लोकांमध्ये करत सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करणंही अनिवार्य आहे. अशा कोरोनाकाळात एक अनोखा लग्नसमारंभ पार पडला, ज्यात कोरोना नियमांचं अगदी काटेकोर पालन करण्यात आलं. वधू-वराने एकमेकांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळत, एकमेकांना हारदेखील लांब दांड्याच्या साहाय्याने घातले. लग्नात सामिल झालेले लोक नवरा-नवरीच्या या कृतीचं कौतुक करत आहेत. बिहारमधील बेगूसरायमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात नववधू-वराने काठीच्या मदतीने एकमेकांमध्ये अंतर राखून हार घातल्यामुळे हा लग्नसोहळा विशेष चर्चेत आला. 30 एप्रिल रोजी हा लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्नात सरकारी गाइडलाइन्सचं पालन करुन 50 लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. यावेळी नवरा-नवरीने मास्क लावलं होतं. तसंच सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत, एकमेकांना हार घातले. कोरोना काळात लग्नसमारंभ करताना मास्क घालणं, 50 लोकांची उपस्थिती, सोशल डिस्टंन्सिंग अशा गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. या लग्नात या सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात आलं होतं. सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करत, अशा परिस्थितीत केलेल्या या लग्नामुळे अनेकांना जागरुक केलं आहे.
हे लग्न माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय असेल, अशी भावना नवऱ्यामुलाने व्यक्त केली आहे. विशेषत: काठीच्या साहाय्याने एकमेकांना घातलेले हार हा क्षण कायम लक्षात राहील, असंही तो म्हणाला. स्थानिकांनीही हे लग्न ऐतिहासिक ठरल्याचं सांगत, कोरोना काळात सर्व नियमांचं पालन करुनच सर्व विधी पार पडल्याचं सांगितलं. हे लग्न समाजात कोरोना गाइडलाइन्सचं पालन करण्याचं सर्वांनाच प्रवृत्त करेल, अशी भावना व्यक्त केली जात असून त्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुकही केलं जात आहे.